जालना : अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झालेल्या जालना जिल्ह्यातील प्रामुख्याने अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यांत चालू वर्षी गुऱ्हाळ संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. या तीन तालुक्यांतील ७७ गावे जायकवाडी लाभक्षेत्रात येतात. जायकवाडीतील पाण्याची उपलब्धता आणि चांगला पाऊस यामुळे या भागांत मोठय़ा प्रमाणावर ऊस लागवड झाली आहे.
घनसावंगी तालुक्यातील उकडगाव येथील कल्याणराव तौर यांनी मागील वर्षी गूळ उद्योग सुरू केला. या वर्षी त्यांचे या उद्योगाचे दुसरे वर्ष आहे. त्यांनी सांगितले की, घनसावंगी आणि अंबड तालुक्यांत गेल्या हंगामात १५-१ ६ गूळ उद्योग होते.
चालू हंगामात ही संख्या दुपटीपेक्षा अधिक झालेली आहे. याशिवाय परतूर तालुक्यात १५-२० गूळ उद्योग सुरू झाले आहेत. या उद्योगांमध्ये दररोज २० ते १०० टनांच्या दरम्यान उसाचे गाळप होते.
अनेकांनी गूळ उद्योगासाठी नवीन यंत्रसामुग्री आणलेली आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर आणि त्याजवळच्या भागातून आणलेल्या या यंत्रसामुग्रीमुळे पारंपरिक गुऱ्हाळाच्या तुलनेत या उद्योगात गूळ लवकर तयार होतो.
एका उद्योगातून ४०-५० जणांना रोजगार उपलब्ध होतो.
राज्यातील गुळासाठी प्रसिद्ध असलेली एक बाजारपेठ जालना येथे उपलब्ध आहे. पाच आणि दहा किलोच्या गुळाच्या भेल्यांना गुजरात तसेच राजस्थानमधून मागणी असते. आमच्या उद्योगात पाक (काकवी) आणि एक किलो भेलीच्या माध्यमातून तयार होणारा गूळ मध्यस्थांच्या मार्फत जर्मनी, अमेरिका आणि अरब देशात जात आहे. परंतु हे प्रमाण कमी म्हणजे आमच्या उत्पादनाच्या दोन टक्के आहे, असे तौर यांनी सांगितले.
५१ हजार क्विंटल आवक
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढय़ात या हंगामात गेल्या ऑक्टोबरपासून गुळाची आवक सुरू झाली. चालू हंगामात आतापर्यंत जवळपास ५१ हजार क्विंटल गुळाची आवक झाली. जालना बाजारपेठेतील अधिक गूळ गुजरातमध्ये जातो. जिल्ह्याच्या व्यतिरिक्त मराठवाडय़ातील अन्य जिल्ह्यांतूनही येथे गूळ विक्रीसाठी आहे. जालना बाजार समितीमधील गूळ मार्केटमध्ये ५० पेक्षा अधिक दुकानांतून खरेदी-विक्रीचे व्यवहार चालतात. पिवळय़ा गुळाच्या तुलनेत लाल गूळ अधिक प्रमाणावर येतो. चालू मार्च महिन्यात बाजार समितीत पिवळय़ा गुळाचा कमाल तीन हजार रुपये क्विंटल भाव २८ मार्च रोजी होता, तर लाल गुळाचा कमाल दोन हजार ६२९ रुपये भावही याच दिवशी होता.