राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत. सरकारी तपास यंत्रणा आता आपला दिवसेंदिवस अधिकच घट्ट करत आहेत. १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या १२ ठिकाणांवर छापेमारी केली गेली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, सांगली व अहमदनगर येथील ठिकाणांचा समावेश आहे. तर,अहमदनगर आणि मुंबईमध्ये डीसीपी राजू भुजबळ यांच्या घरी आणि पुणे, मुंबईत एसीपी संजय पाटील यांच्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली आहे.

देशमुखांना दिलासा नाहीच!

भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. देशमुखांवरील आरोपांची सीबीआयतर्फे चौकशी सुरू आहे. अशा वेळी न्यायालयाचा हस्तक्षेप हा सत्य उघड करण्यातील अडथळा ठरू शकतो. त्यामुळे सीबीआयला सत्य शोधण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने देशमुख यांची याचिका फेटाळताना स्पष्ट केले आहे.

आपल्यावरील कारवाईसाठी सीबीआयने राज्य सरकारची मंजुरी घेणे अनिवार्य होते असा दावा देशमुख यांनी केला होता. मात्र न्यायालयानेच या प्रकरणी  चौकशीचे आणि पुढील कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यामुळे सरकारच्या पूर्वपरवानगीची गरज नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे.