राज्यात गोविंदा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारच्या या धोरणावर सडकून टीका केल्यानंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी “गोविंदा आरक्षणाला फक्त राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करत असून त्यांनी आत्मपरीक्षण करावे”, असा सल्ला राष्ट्रवादीला दिला. ते बुलडाण्यात माध्यमांशी बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राला हा निर्णय योग्य वाटतोय. दहीहंडीला सरकारने खेळाचा दर्जा दिलाय. ते लोकांमध्ये ऊर्जा तयार करण्याचे काम करत आहे. दहीहंडी सांस्कृतिक खेळ असून गोविंदांना या माध्यमातून संरक्षण मिळेल.”

“पुढील काळात मुख्यमंत्री कोणाचा होईल हे सांगता येणार नाही”

यावेळी बावनकुले पुढील काळात कुणाचा मुख्यमंत्री होणार यावर सूचक वक्तव्य केलं. “पुढील काळात मुख्यमंत्री कोणाचा होईल हे सांगता येणार नाही. शिंदे-फडणवीस सरकार १०० च्या स्पीडने सरकार चालवत आहेत. मागील सरकारचा हा तीन चाकी ऑटो होता. त्याला धक्का मारून चालवायचे, मात्र ही गाडी बुलेट ट्रेनसारखी चालत आहे,” असं म्हणत बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला.

बावनकुळे पुढे म्हणाले, “तुम्ही विचार करू शकणार नाही की शिंदे फडणवीस सरकार किती वर्ष चालेल. हे सरकार चौकार आणि षटकार मारणारं सरकार आहे. सरकारने ४८ दिवसांत ५८ निर्णय घेतले आहेत. हे सरकार १८ घंटे काम करणारं सरकार आहे.”

हेही वाचा : चंद्रशेखर बावनकुळेंनी बायकोही पळवून आणली – नितीन गडकरींची तुफान शाब्दिक फटकेबाजी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मागील सरकारचे मुख्यमंत्री १८ महिने मंत्रालयात आलेच नाही,” असं म्हणत बावनकुळेंनी उद्धव ठाकरे आणि सरकारवर टीका केली.