Chhagan Bhujbal : पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर काही जण नाराज आहेत असं विचारलं असता छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. तसंच मी काही सरकारमध्ये नाही त्यामुळे मला ते पद देण्यात आलं नाही असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत. काही वेळापूर्वीच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सैफ अली खान हल्ला प्रकरणावर त्यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर झाले आहेत. पण काही प्रमाणात नाराजी आहे असं विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, “मी सरकारमध्ये नाही त्यामुळे कोण नाराज वगैरे आहे ते मला माहीत नाही. मी कालच पालक मंत्र्यांची यादी वाचली आहे. बीडचं पालकमंत्री पद अजित पवारांनी घेतलं आहे ही चांगली गोष्ट आहे. पालकमंत्री हे पद मंत्र्यांना दिलं जातं. मी मंत्री नाही त्यामुळे मला ते पद दिलेलं नाही.” असं छगन भुजबळ म्हणाले.

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत काय म्हणाले छगन भुजबळ?

“मला अशी माहिती मिळाली की मुख्य हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. तो भुरटा चोर आहे हे सांगितलं जातं पण तो बांगलादेशी आहे. तो अलिकडेच मुंबईत आला असेल. चोरीच्या उद्देशाने तो सैफ अली खानच्या घरात शिरला होता. ठाण्यातून त्याला अटक करण्यात आली. दुसरी बाब अशी की वांद्रे परिसरात अनेक श्रीमंत लोक राहतात. काही बॉलिवूड स्टार राहतात. चोर अशाच ठिकाणी चोरी करतात, काहीतरी मिळेल या उद्देशानेच ते तिथे जातात. दीड कोटीहून अधिक लोकसंख्या मुंबईची आहे. पण मुंबई पोलीस सगळी जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. पण असे प्रकार घडू नयेत म्हणून पोलीस प्रयत्न करतील अशी मला खात्री आहे. सायबर कायदा मी गृहमंत्री असताना सुरु केला होता. तसंच मुंबईत सीसीटीव्हीही लावण्यात आले आहेत. त्यामुळेच तो चोर सापडू शकला आहे. आपणही सगळ्यांनी जागरुक राहिलं पाहिजे.” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

पक्षात काही बदल होणं आवश्यक आहे-भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीत अधिवेशन सुरु आहे. जे काही काम करु शकत नाहीत असे लोक असतील, जे फारसे अॅक्टिव्ह नाहीत अशा लोकांना बदललं पाहिजे. पक्षाचं संसदीय मंडळ स्थापन केलं गेलं पाहिजे त्यामध्ये हे निर्णय झाले पाहिजेत. जिल्हा परिषद महापालिका यांच्या निवडणुका आहेत अशा वेळीही या समित्या निवडीसाठी उपयोगाला येतील. सामूहिक निर्णय घेतले गेले पाहिजेत असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता कॉलर उडवण्याचे दिवसही गेले राव-भुजबळ

उदयनराजेंप्रमाणे तुम्हीही कॉलर उडवताना दिसला होतात, याबाबत विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, “नाही, नाही मी कॉलर उडवत नव्हतो. आमचे डॉक्टर सूर्या हे न्यूरॉलॉजिस्ट आहेत. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांची एपीएमसी फाऊंडेशन यांची संस्था आहे. त्यांचा ग्रुप चालला होता तेव्हा दाखवत होतो की मी सुद्धा तुमचा टी शर्ट घातला आहे. बाकी काय कॉलर उडवण्याचे दिवस पण गेले राव.” असं वक्तव्य भुजबळ यांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.