वंचित बहुजन आघाडीची शनिवारी ( २५ नोव्हेंबर ) मुंबईतील शिवाजी पार्क येथे संविधान सभा पार पडली. या सभेतून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना इशारा दिला होता. ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये, असं प्रकाश आंबेडकरांनी ठणकावलं होतं. यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं, “आरक्षणावरून वाद सुरू झाला आहे. ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये. कारण, इतिहास काढला, तर तुम्ही मंडलबरोबर नव्हता तर, कमंडलबरोबर होता. मग, ते प्रकाश शेंडगे असो किंवा छगन भुजबळ…”

हेही वाचा : “३ डिसेंबरनंतर देशात कुठे ना कुठे नरसंहार…”, निवडणूक निकालावरून प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

“जनता दल आणि त्याआधी जनता पक्षाबरोबर मिळून आम्ही ओबीसी आरक्षण मिळवलं आहे. आता आरक्षण वाचवता येत नाही, म्हणून भिडवण्याची भाषा चालली आहे,” असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला होता.

“मंडल आयोगासाठी प्रकाश आंबेडकरांनी फार मेहनत घेतली”

दरम्यान, हिंगोलीतील ओबीसी मेळाव्याला हजर राहण्याआधी प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या इशाऱ्याबद्दल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी छगन भुजबळांना विचारलं. त्यावर भुजबळ म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांना सांगू इच्छितो, मी एक शब्दही त्यांच्याविरोधात काढला नाही. मंडल आयोगासाठी प्रकाश आंबेडकरांनी फार मेहनत आणि कष्ट घेतले आहेत.”

हेही वाचा : “…त्यादिवशी तुला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही”, मोदी सरकारचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांचं भाष्य, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अडचणीत असताना प्रकाश आंबेडकरांनी सहकार्य करावे, अशी विनंती करतो. विनंती करणं चूक नाही. पण, ‘ओबीसी आणि मराठ्यांचं ताट वेगळं असुदे,’ असं मत प्रकाश आंबेडकरांनी मांडलं आहे,” असेही भुजबळांनी सांगितलं.