नांदेड : प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीही अर्ध्या चड्डीची लाज वाटते, असे सांगत शालेय गणवेशात फुल पॅन्ट देण्याची मागणी केली आहे. कंधार तालुक्यातील उस्माननगरच्या शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या वरील मागणीची सध्या जिल्हाभरात चर्चा सुरू झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्ष सोमवारपासून सुरू झाले. मागील दोन महिने उन्हाळी सुट्टीमुळे बंद असलेल्या शाळा शिक्षक-कर्मचारी-विद्यार्थी आणि पालकांच्या गर्दीने गजबजल्याचे दिसले. शिक्षण विभागाने शहरी आणि ग्रामीण भागात वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून शाळेचा पहिला दिवस साजरा केला. कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतही पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. याच शाळेतील तिसरीच्या विद्यार्थ्यांनी शालेय गणवेशात फुल पॅन्ट देण्याची मागणी केल्याचे सांगण्यात आले. अशी मागणी यापूर्वी कोणत्याही विद्यार्थ्यांकडून समोर आली नव्हती. पण उस्माननगरच्या शालेय विद्यार्थ्यांनी एक नवा विषय चर्चेत आणला.
शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे शिक्षक-विद्यार्थी आणि पालकांना शुभेच्छा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि इतर कार्यातून आपल्या शाळेचे, गावाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन सावे यांनी केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्याकडे शासन प्रयत्नशील असल्याचे सावे यांनी नमूद केले.
नांदेड मनपाच्या ‘पीएमश्री’ प्राथमिक व माध्यमिक शाळेत प्रदीर्घ विश्रांतीनंतर आज घंटा वाजली. मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, उपायुक्त नितीन गाढवे, शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या उपस्थितीत शाळेतील प्रवेशोत्सव साजरा झाला. सर्व विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. अशाच स्वरुपाचे कार्यक्रम शहर आणि जिल्हाभरातील अनेक शाळांमध्ये पार पडले.
मुख्याध्यापिका धार्मिक पर्यटनावर
शाळेच्या पहिल्या दिवशी सर्वच शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक कर्तव्यावर हजर असल्याचे, आपल्या शाळांमधील उपक्रमांमध्ये ते सक्रिय असल्याचे दृश्य ठिकठिकाणी दिसत असताना पूर्णवेळ राजकारणात असलेल्या शहरातल्या एका शाळेच्या मुख्याध्यापिका मात्र धार्मिक ठिकाणच्या पर्यटनावर असल्याचेही सोमवारी दिसून आले. या मुख्याध्यापिकेने उत्तर प्रदेशातील धार्मिकस्थळावरील छायाचित्र समाजमाध्यमांतून प्रसृत केले.
नांदेड जिल्ह्यात २ हजार १८४ जिल्हा परिषदेच्या शाळा असून, ६ लाख ३० हजार विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. गणवेषाचा रंग आणि प्रारुप ठरलेले आहे. काही अधिकार स्थानिक शालेय समितीलाही देण्यात आलेले आहेत. काही विद्यार्थ्यांकडून चड्डी ऐवजी फुल पॅण्टची मागणी पुढे आलेली असेल तर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शालेय समितीसोबतच्या चर्चेतून निर्णय घ्यावेत, अशा सूचना देण्यात येतील.– वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)