Devendra Fadnavis : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन जवळपास दोन महिने झाले आहेत. मात्र, अद्याप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वेगवेगळे आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपानंतर राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. खरं तर महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र म्हणून वर्षा बंगल्याला एक महत्व आहे. मात्र, असं असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अद्याप वर्षा बंगल्यावर राहण्यास का गेले नाहीत? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. मात्र, आता या सर्व चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर मत व्यक्त केलं आहे.

‘लोकसत्ता – वर्षवेध’च्या अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (४ फेब्रुवारी) पार पडले. यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर सविस्तर भूमिका मांडली. याचवेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्षा बंगल्याच्या संदर्भात सुरु असलेल्या चर्चांवरही प्रतिक्रिया देत अद्याप आपण वर्षा बंगल्यावर राहण्यास का गेलो नाही? याचं कारणही सांगितलं. दरम्यान, यावेळी झालेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातील राजकारणासह विविध विषयांवरही भाष्य केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सध्या वर्षा या निवासस्थानाबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. नक्की काय आहे? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “मला असं वाटतं की अलिकडच्या काळात काही बाबतीत मीडिया वेड्यांचा बाजार होतोय. माफ करा, पण स्पष्ट सांगतो. आज मी एका माध्यमांवर पाहतो होतो की वर्षा पाडणार? काय वेड्यांचा बाजार आहे? वर्षा ही काय कोणाच्या घरची मालमत्ता आहे का? असं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे. पण त्यापूर्वी त्या ठिकाणी काही छोटी-मोठी कामे सुरु होती. दरम्यानच्या काळातच माझी मुलगी १० वीत आहे. १७ तारखेपासून तीची परीक्षा सुरु आहे. त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण तिकडे शिफ्ट होऊ. त्यामुळे मी वर्षा निवासस्थानावर सध्या शिफ्ट झालो नाही. मुलीची परीक्षा झाल्यानंतर मी वर्षा या निवासस्थानावर शिप्ट होणार आहे. मात्र, सध्या एवढ्या वेढ्यासारख्या चर्चा सुरु आहेत. मला तर वाटतं की माझ्या सारख्या माणसांने यावर उत्तरही देऊ नये”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘१०० दिवसांत रिपोर्ट कार्ड देणार…’

तीन पक्ष एकत्रित असल्यानंतर प्रशासनामध्ये तुम्हाला किती मोठं आव्हान आहे असं वाटतं? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही गेले अडीच वर्ष तीन पक्षाचं सरकार चालवलं. आताही तीन पक्षाचं सरकार चालवत आहोत. अनेक महत्वाचे निर्णय घेत आहोत. त्यामुळे मला वाटत नाही की प्रशासनामध्ये त्या काही अडचणी येतात. प्रशासनासाठी आमची लाईन फार स्पष्ट आहे. कारण आमचं धोरणावर फार दुमत नाही, म्हणजे मला एक धोरण हवं आहे आणि मग शिवसेना, राष्ट्रवादीला दुसरं धोरण हवं असं काही नाही”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमचं वेगवेगळ्या विषयांवर दुमत असू शकतं, एखाद्या व्यक्तीवर दुमत असू शकतं, पण धोरणावर नाही. त्यामुळे धोरणाची एक दिशा सर्व विभागांना दिलेली आहे. १०० दिवसांचा कार्यक्रम आम्ही प्रत्येक विभागाला दिला आहे. तसेच प्रत्येक विभागाचं आम्ही सादरीकरण घेणार आहोत. त्यांना त्याचे टार्गेट देखील दिलेले आहेत आणि ते विभाग टार्गेट पूर्ण करण्याचं काम करत आहेत. आमच्या सरकारमधील काही मंत्री देखील त्यावर लक्ष ठेवून आहोत. त्यात कुठेही अडचण नाही. त्यामध्ये आमचा प्रयत्न असा आहे की १०० टक्के टार्गेट पूर्ण झालं पाहिजे. आम्ही १०० दिवसांचा कार्यक्रम दिलेला आहे, त्याबाबत १५ एप्रिलपर्यंत काय करायचं? ते आम्ही सर्व विभागांना सांगितलं आहे. त्यामधील काय टार्गेट पूर्ण केलं याचा एक रिपोर्ट आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.