राज्यपालांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेल्या कॉंग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन मंगळवारी मागे घेण्यात आले. विधीमंडळ कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेमध्ये याबाबत माहिती दिली.
राहुल बोंद्रे, अमर काळे, अब्दुल सत्तार, वीरेंद्र जगताप आणि जयकुमार गोरे या पाच आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. निलंबन मागे घेण्यासाठी कॉंग्रेसकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते. त्याला अखेर मंगळवारी यश मिळाले. विश्वासदर्शक ठरावावेळी मतविभागणीची मागणी धुडकावत आवाजी मतदानाने सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर बसकण मारीत अभिभाषणासाठी आलेल्या राज्यपालांना घेराव घातला. या वेळी सुरक्षा रक्षक आणि आमदारांमध्ये झटापटही झाली होती. यामुळे सरकारने या पाच आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. तो मंजूर झाल्यामुळे कॉंग्रेसचे विधानसभेतील संख्याबळही तात्पुरते कमी झाले होते.