संगमनेर : संजय गायकवाड यांच्यापाठोपाठ अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्याविषयी केलेले वक्तव्य म्हणजे आजची नथुराम गोडसे प्रवृत्ती आहे. बोंडे यांचे वक्तव्य भाजपा नेत्यांच्या सूचनेनुसार केले गेलेले वक्तव्य आहे. भाजपा आणि महायुतीच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला आहे, अशा शब्दांत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी संताप व्यक्त केला आहे. एका व्हिडीओ संदेशाद्वारे आमदार थोरात म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय परंपरा संपवण्याचा उद्योग २०१४ ला सुरू झाला, तो रोज खालच्या पातळीवर जात आहे.

हेही वाचा >>> Hiraman Khoskar : “…तर मी राजीनामा देणार”, काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचा सरकारला इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दररोज महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळिमा फासत आहेत. त्यांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांचा या वाचाळवीरांना मूक पाठिंबा आहे, हे अत्यंत धोकादायक आहे. संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्यावर त्वरित कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालणारे त्यांच्या पक्षाचे नेते त्यांच्याएवढेच दोषी आहेत. “देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या बाबतीत जे कृत्य केले गेले, तेच कृत्य राहुल गांधींच्या बाबतीत करावे ही दुष्प्रवृत्ती निषेधार्ह आहे. गांधी हे केवळ आमचे नेते नाहीत, तर देशातले विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या बाबतीत या पातळीवर बोललं जात असेल, तर तुमच्या नेत्यांसंदर्भातसुद्धा वाईट बोलणं आम्हाला शक्य आहे; परंतु ती आमची संस्कृती नाही याची आठवणही थोरात यांनी करून दिली आहे. गायकवाड, बोंडेंना तर जनता शिक्षा देईलच; पण त्यांच्य कर्माची फळं त्यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांनाही भोगावी लागणार आहेत” , असा इशाराही आमदार थोरात यांनी दिला आहे.