दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी केलं आहे. राज ठाकरेंच्या भोंग्याच्या भूमिकेवर टीका करताना त्यांनी वक्तव्यानंतर प्रवाहित होऊन दंगलीत उतरतात प्रत्यक्षात ती बहुजन मुलं असतात असंही म्हटलं. औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात एका कार्यक्रमात सुजात आंबेडकर यांनी हजेरी लावली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. दरम्यान त्यांच्या या विधानावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले सुजात आंबेडकर –

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यासंबंधी विधान केल्यानंतर सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंना सर्वात आधी अमित ठाकरेंना हनुमान चालिसा बोलायला लावा असं आव्हान दिलं होतं. दरम्यान त्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “मी अमित ठाकरेंना तुम्ही येऊन हनुमान चालिसा म्हणा असं काही वैयक्तिक निमंत्रण नव्हतं. ती एक बोलण्याची पद्दत असते. आतापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या ती बाबरी मस्जिदची दंगल असो, भीमा कोरेगावची दंगल असो. आपण हेच बघितले की दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय ब्राह्मण असतात. त्यांच्या वक्तव्यानंतर प्रवाहित होऊन दंगलीत उतरतात प्रत्यक्षात ती बहुजन मुलं असतात”.

“दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय ब्राह्मण असतात”; सुजात आंबेडकरांचा आरोप

“माझं राज ठाकरेंना एवढंच म्हणणं होतं की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहुजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवा. जर तुम्ही स्वत:च्या मुलाला उतरवणार नसाल तर मग दुसऱ्यांच्याही उतरवू नका,” असं सुजात आंबेडकर यांनी सांगितलं.

शरद पवार मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळं असतं; यशोमती ठाकूर यांच्या विधानावर सुशीलकुमार स्पष्टच बोलले, म्हणाले…

“२०१४ मध्ये लोकांच्या भूकमारीचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न असे सर्व आश्वासन देऊन सत्तेत आला. पण सत्तेत आल्यावर कोणीही यावर बोलायला तयार नाही. करोना काळात सर्व आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली होती, त्यावर कुणीही बोलत नाही. असं असतानाही जर भाजपा किंवा राज ठाकरे असेच हिंदू-मुस्लिम दंगलीवर बोलत असतील तर येथील लोकांना भावनिक धर्माच्या प्रश्नांमध्ये अडकून ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचा सरळसरळ अर्थ होतो,” अशी टीका सुजात आंबेडकर यांनी केली.

सुशीलकुमार शिंदेंची प्रतिक्रिया –

सुजात आंबेडकर यांनी दंगल पेटवणारे उच्चवर्णीय ब्राह्मण असतात असं विधान करण्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “एका जातीला दोष देण्यात अर्थ नाही. ब्राह्मण, मराठा, दलित सर्वांनी सर्वधर्म समभावाची पूजा केली पाहिजे असं माझं मत आहे”.

कोणी जातीचा प्रश्न हाताळत असेल तर हे योग्य नाही. जाती धर्माचे राजकारण या देशात चालत नाही. त्यामुळे आता झालेल्या गोष्टी हातात घेऊन महाराष्ट्र चालणार नाही असंही ते म्हणाले.

राज्यातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु असून पातळी खालावली असल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी म्हटलं की, “काय बोलावं हेच कळत नाही. आम्ही जो काळ अनुभवलेला आहे त्यावेळी काही परंपरा, इतिहास, संकल्पना आणि काही संकेत पाळून बोलत होतो. आज ते कमी झालं आहे. याच्यातूनही ते सुधारतील अशी अशा आहे”.