महाराष्ट्रात करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वतोपरी प्रयत्न करत असून आज त्यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सहकार्य करत असल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. तसंच लोकल, बस सेवा, बँका आणि अत्यावश्यक सेवांबद्दल घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. अशाच महत्वाच्या घोषणा थोडक्या जाणून घेऊयात.

– करोना साथीचा प्रसार थांबविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र सार्वजनिक वाहतूक पूर्णत: बंद करणे शक्य नाही.

– अनेकांनी सल्ले दिले आहेत की बसेस, रेल्वे बंद करा, पण अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची ने आण कशी करणार? मनपा कर्मचारी, वाहनचालक काय करणार ? तूर्त या सेवा सुरु राहणार आहेत.

– पुढील १५ ते २० दिवस अधिक काळजी घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील शासकीय कार्यालयांतील उपस्थिती 25 टक्क्यांवर आणणार आहोत.

– बँका अत्यावश्यक सेवा असून आर्थिक व्यवहार सुरु राहणं गरजेचं आहे. त्यामुळे बँका सुरु राहतील.

मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर या मोठ्या शहरांत सर्व कार्यालये, दुकाने बंद होतील. यातून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहे. यात अन्नधान्य, दुध, मेडिकल यांचा समावेश आहे. या शहरांमध्ये कुणाला काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी बोलू शकतात.

– ही बंदी ३१ मार्चपर्यंत असणार असून आज मध्यरात्रीपासून हे आदेश लागू होणार आहेत.

– ज्या आस्थापना, दुकाने बंद करतो आहात त्यांना माझे आवाहन आहे की आपला जो कष्टकरी कर्मचारी वर्ग आहे त्यांना किमान वेतन देणे बंद करू नका.

– आर्थिक वर्ष २०१८-१९ चे सुधारित व उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची ३१ मार्चची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती आपण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे

– याशिवाय २३४ बी अंतर्गत व्याज वाचविण्यासाठी अग्रिम कर भरण्याची तसेच ३० एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदतही वाढवून द्यावी अशी विनंती केली. फेब्रुवारी २०२०ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख २२ मार्च आहे, ती देखील वाढवावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

– जगण्यासाठी आपल्याला घरात थांबण्याची वेळ आली आहे. पुढचे १५ -२० दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. संसर्ग टाळणे महत्वाचे आहे. काही गोष्टी आपल्या काळजीसाठी घेत आहोत. आपले सहकार्य असू द्या