राज्यातील करोना रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या २४ तासात राज्यात ४३,६९७ नव्या करोनाबाधितांची भर पडली असून ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात ४६,५९१ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कालच्या तुलनेत आज राज्यातली रुग्णसंख्या ४ हजारांनी वाढली आहे. राज्यात आज ४९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर १.९३ टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत ६९ लाख १५ हजार ४०७ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.०४ टक्के आहे. सध्या राज्यात २३ लाख ९३ हजार ७०४ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत तर ३,२०० व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आजपर्यंत ७ कोटी २५ लाख ३१ हजार ८१४ प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत. हेही वाचा - राज्यातल्या शाळा लवकरच सुरू होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांपाठोपाठ आदित्य ठाकरेंचेही संकेत राज्यात आज २१४ नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातल्या एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या आता २,०७४ झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे १५८ रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रात आढळले आहेत. त्याखालोखाल मुंबईत ३१, पुणे ग्रामीण भागात १० तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी ४ रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील करोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचं चित्र आहे. मुंबईत बुधवारी ६,०३२ नवे रुग्ण आढळले असून १२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १६,४४८ झाली आहे. तर नव्या बाधितांच्या तुलनेत जवळपास तिप्पट रुग्ण म्हणजेच १८,२४१ जणांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून ९५ टक्के इतका आहे.