रत्नागिरी : दिलेला निधी विकास कामांना वापरा एवढी माझी अट होती. त्यानुसार गेल्या तीन वर्षांमध्ये रत्नागिरी मध्ये लोकाभिमुख विकास प्रकल्प उभे राहिले आहेत, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद व कृषी विभाग नाविण्यपूर्ण घटक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना भात व नाचणी पिकाचे मोफत बियाणे , सिंधुरत्न समृध्द योजनेतून आंबा वितरकांना चारचाकी वाहन वितरण तसेच नागरी सुविधा योजनेंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी ८० सीएनजी घंटागाड्यांचे वितरण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यामध्ये प्रगती सरकार आणि समृध्दी सरकार आहे. राज्याला पुढे नेणारे सरकार आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे, आपला मायबाप आहे, त्याला जे बियाणे देतो ते अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या प्रतीचे असले पाहिजेत, याची नोंद अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे ही सांगितले.

ते म्हणाले, दिलेला निधी विकास कामांना वापरा एवढी माझी अट होती. कामाचा दर्जा अतिशय चांगला असला पाहिजे. वेळेमध्ये काम पूर्ण झाले पाहिजे. ही माफक अपेक्षा ठेवून निधी दिला. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये ज्या निधीचे वाटप झालं, त्याची कामं आज महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत. महाराष्ट्र नंबर एक मध्ये उद्योगात आहे. देशभराच्या ४० टक्के गुंतवणूक फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. याचं कारण महाराष्ट्रात लोक येतात. उद्योग वाढवू इच्छितात. टाटाच्या माध्यमातून देखील स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरु करतोय. इन्वेंशन इनोवेशन इंक्युपेशन सेंटर आपण गडचिरोलीत करतोय. जिल्हा परिषद ग्रामिण भाग हा अतिशय महत्‍त्वाचा आहे. या घंटागाड्या आपल्याला फायदेशीर ठरतील. आरोग्य आपलं समृद्ध राहील. कचरा आपल्याला डम्प करता येणार नाही. त्याच्यावर प्रक्रिया करणं ही देखील काळाची गरज आहे . पावसाळी शेती आपल्याला करून भागणार नाही, आपल्याला समुद्राला वाहून जाणारे पाणी थांबवलं पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले.

गटशेतीकडे वळलं पाहिजे . इथला शेतकरी रोजगारासाठी दुसरीकडे जाता कामा नये. गेलेला तो पुन्हा वापस आला पाहिजे. सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र आमचा प्रयत्न नक्की राहणार आहे अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, दोन वर्षानंतर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये किमान १५ ते २० हाऊसबोट बचत गट चालवतील अशा पद्धतीची यंत्रणा आम्ही सुरू केली असल्याचे सांगितले. तसेच राज्यमंत्री यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.