केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गंभीर तक्रार करत राज्य सरकारवर एक नवीनच लेटर बॉम्ब फोडला आहे. “राज्यात महामार्गांच्या कामात शिवसेना कार्यकर्ते अडथळे आणत आहेत”, अशी तक्रार करतानाच अशा परिस्थितीत राज्यातील कामं करावीत की नाही, याचा गांभीर्याने विचार करावा लागेल, अशी संतप्त तक्रार नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी पक्ष शिवसेना आणि शिवसेनेचे प्रमुख असलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“आरोपांमधील तथ्य तपासून पाहावे लागेल”

“केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे की, रस्त्यांच्या कामात शिवसैनिक अडथळा आणत त्यावर ते म्हणाले की, मी काल बातमी वाचली आहे. तो आरोप असून त्यामध्ये तथ्य आहे की नाही ते तपासून पाहण्याची गरज आहे. मागील ३० वर्षांपासून समाजकारणात आणि राजकारणात काम करीत आहे. त्या दरम्यान नेहमी सांगत आलो आहे की, हा जनतेचा पैसा असतो. जनतेच्या पैशाचा विनियोग चांगल्या कामासाठी झाला पाहिजे. कामाचा दर्जा चांगला राखला गेला पाहिजे. तो दर्जा चांगला राखला जात नसेल तर संबधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी पदाचा गैरवापर करणाऱ्यांना देखील सुनावले आहे. “जर ठेकेदार चांगल काम करत असेल आणि काही जण राजकिय पक्षाचा आधार घेऊन किंवा मिळालेल्या पदाचा गैरवापर करून जर कोणाला त्रास देत असेल तर तो त्रास ताबडतोब थांबविला गेला पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.

“कामाच्या दर्जाबाबत मुख्यमंत्री आग्रही”

अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाच्या पद्धतीचं देखील यावेळी कौतुक केलं. “आता थेट मुख्यमंत्र्यांना नितीन गडकरींनी पत्र लिहिले. पण मी गेली पावणेदोन वर्ष मुख्यमंत्र्यांसोबत काम करीत आहे. त्या दरम्यान अनेक उदघाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांवेळी त्यांचे एकच सांगणे असते. कामाचा दर्जा चांगला ठेवा हा कटाक्ष त्यांचा असतो. जेव्हा अधिकाऱ्यांसोबत बैठक होते. तेव्हा पर्यावरण, कामाचा दर्जा, विकास कामादरम्यान वृक्षतोड कशी टाळता येईल यासाठी त्यांचा विशेष प्रयत्न असतो. त्यामुळे या प्रकरणी ते लक्ष घालतील आणि शहानिशा करतील, याबद्दल मला १०० टक्के खात्री आहे. त्यामधून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्यास मदत होईल. कुठल्या कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने किंवा नागरिकाने विकास कामात अडथळा आणता कामा नये”, अशी अपेक्षा देखील अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

BJP, Nitin Gadkari, Maharashtra CM Uddhav Thackeray
शिवसेना कार्यकर्ते रस्त्यांच्या कामात अडथळे आणत आहेत, गडकरींचं थेट उद्धव ठाकरेंना पत्र

काय म्हणाले आहेत गडकरी पत्रामध्ये?

मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या दोन पानी पत्रात राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अडथळा आणत असल्याची तक्रार गडकरी यांनी  केली आहे. राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांत तीन ठिकाणी नियमबाह्य कामांसाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांना त्रास दिला जात आहे, यामुळे काम बंद पडण्यापर्यंत परिस्थिती गेली असल्याबद्दल तीव्र संताप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केला आहे. एवढंच नाही ही परिस्थिती कायम राहिली तर कामे सुरु ठेवावीत का ? याचा विचार आपला विभाग करत आहे अशी स्पष्ट भूमिका गडकरी यांनी घेतली आहे.

…तर आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल; गडकरींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून व्यक्त केला संताप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्धवट रस्त्यांची कामे ही रस्ते वाहतुकीस धोकादायक ठरतील आणि अपघातांचे प्रमाण वाढेल अशी भिती गडकरी यांनी व्यक्त केली आहे. कामात अडथळे आणणारी अशी परिस्थिती कायम राहिली तर यापुढे राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्याबाबात विचार करावा लागेल असा गंभीर इशारा या पत्राद्वारे गडकरी यांनी दिला आहे.