उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा एप्रिल महिन्यापासून सुरु झाली. मात्र शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील दोन्ही राष्ट्रवादी एक होतील या चर्चा २०२४ च्या डिसेंबर महिन्यापासून सुरु आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन पुण्यात पार पडला. यावेळी शरद पवार यांनी भाषण करत असताना पक्ष फुटला, फुटायला नको होता म्हणत एक भाष्य केलं. अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का? याबाबत विचारलं असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं.
आपल्या पक्षात फूट पडली आहे पण…-शरद पवार
आपल्या पक्षात फूट पडली, फूट पडावी असं काही वाटत नव्हतं पण फूट पडली. काही मुलभूत विचारांमध्ये फरक झाला आणि फूट पडली. जे राहिले आहेत ते विचारांनी राहिले आहेत. उद्या निवडणुका होतील तेव्हा वेगळं चित्र बघायला मिळेल. १९८० मध्ये माझ्या हाती सत्ता होती. त्यावेळी निवडणूक झाली होती आणि ५० ते ५२ आमदार निवडणून आले. पुढच्या सहा महिन्यात ६ आमदारच शिल्लक राहिले. बाकी सगळे ५० ते ५२ आमदार सोडून गेल होते. त्यानंतर जी निवडणूक आली तेव्हा राष्ट्रवादीची संख्या ७२ झाली. राज्य सरकारमध्ये काम करता आलं. त्यामुळे फुटीची चिंता करु नका. आपण एकसंध राहिलो आणि जनतेशी बांधिलकी कायम ठेवली तर काहीही फरक पडत नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केलं आहे. दरम्यान अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का हा प्रश्न आज देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“शरद पवार -अजित पवार एकत्र येतील का? हे तेच सांगू शकतात, त्यांनी पूर्णविराम दिलाय का? तेच सांगू शकतात. यातल्या कुठल्याच गोष्टीवर माझ्याकडे अशी शक्ती नाही की त्यांच्या मनात शिरुन त्यांच्या मनातलं जाणून तुमच्यापुढे ठेवू शकेन.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. जयंत पाटील सगळ्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा हे त्यांना मुक्त करणार असल्याचं माहीत असल्याने म्हणाले? त्यांच्या मनात काही दुसरं आहे का? हे सगळं समजून घ्यावं लागेल. असं देवेंद्र फडणवीस मिश्किलपणे म्हणाले.
अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहेत. मात्र दोन्ही नेत्यांनी याबाबत भाष्य केलेलं नाही. आता देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलं असता ते दोघंच याबाबत सांगू शकतात असं म्हटलं आहे. महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत या पार्श्वभूमीवर नेमकं काय होतं ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.