Pune Porsche Crash Latest Updates: पुण्यातल्या कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली. अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू या धडकेत झाला. या दोन निरपराधांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या १५ तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. ज्याचे पडसाद सोशल मीडियासह राज्यभरात उमटले. या मुलाची रवानगी सध्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मात्र यावरुन आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता या प्रकरणाचं राजकारण केलं जातं आहे असं उत्तर त्यांनी दिलं आहे.

१९ मेच्या पहाटे अपघात, दोघांचा मृत्यू

पुण्यातल्या कल्याणी जंक्शन भागात १९ मेच्या पहाटे २.३० सुमारास मद्यधुंद अवस्थेत १७ वर्षीय मुलाने भरधाव वेगात पोर्श कार चालवत एका मोटरसायकलला धडक दिली. त्यात दोन इंजिनिअर्सचा मृत्यू झाला. येरवडा पोलीस ठाण्यात मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातानंतर आठ तासांनी मुलाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. गुन्हा घडताना त्याने मद्यपान केले होते का? हे तपासण्यासाठी ते नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. अशात आता अमितेश कुमार यांनी मुलाला काय घडू शकतं याची कल्पना होती त्यामुळे रक्तचाचणी अहवाल महत्त्वाचा नाही असं म्हटलं आहे.

हे पण वाचा- Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाची आई कॅमेरासमोर ढसाढसा रडली, म्हणाली; “प्लीज..”

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

“दोन निष्पाप जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलामुळे अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांच्या पालकांची अवस्था पाहिलीत का? याची जबाबदारी कोण घेणार? रस्ते सुरक्षेबाबत सरकार काही बोलणार की नाही? माझा आरोप आहे की हा मोठा गुन्हा आहे. ज्याने केला असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मात्र देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत असं म्हणाले की पोलिसांनी राजकीय दबावाखाली दबलं जाऊ नये. राजकीय दबाव कुणी टाकला? याचं उत्तर मिळालं पाहिजे. राजकीय दबाव टाकला गेला हे सरकारनेच मान्य केलं आहे. त्यामुळे माझ्या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे.” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

त्या मुलाला पिझ्झा बर्गर कुणी दिला?

“अल्पवयीन मुलाला जेव्हा पकडण्यात आलं तेव्हा त्याला पिझ्झा-बर्गर कुणी दिला? तसंच माझा हा प्रश्नही आहे की १७ वर्षांच्या मुलाला दारु कशी काय दिली? गाडीची चावी देताच कशी काय? एक युवक आणि युवती या दोघांचा मृत्यू झाला आहे. ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली त्याचा मी निषेध करते. कुणी फोन केल्यावर त्या मुलाला जामीन मिळाला याचं उत्तर देशाला मिळालं पाहिजे. या सगळ्या प्रकरणात सरकारचा हलगर्जीपणा सपशेलपणे दिसून येतो आहे. या सगळ्यावर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून उत्तर दिलं पाहिजे.”सुप्रिया सुळे म्हणाल्या. संजय राऊत यांनीही असाच आरोप केला होता. या सगळ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी टीकेला उत्तर दिलं आहे.

पोर्श अपघात प्रकरणावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“पुण्यात जी घटना घडली त्याचं राजकीयकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. जी कारवाई करायला पाहिजे ती उघडपणे केली आहे. बाल हक्क न्यायालयाने जो चुकीचा निर्णय होता त्याविरोधात कोर्टात जाऊन तो निर्णयही बदलण्यात आला. या प्रकरणात पबचे मालक, मुलाचे वडील यांनाही अटक झाली आहे. कडक कारवाई झाली आहे. पण प्रत्येक गोष्टीचं राजकीयकरण करणं सुरु आहे. जे योग्य नाही.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुण्यात पोर्श कारने धडक दिल्याने अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेचे विविध पडसाद उमटत आहेत. अशात देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.