राम भाकरे, नागपूर
आज राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आले आहेत. भाजपाचे धनंजय महाडिक आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार यांच्यापैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. या लढतीमध्ये धनंजय महाडिक यांचा विजय झाला. दरम्यान या निकालानंतर आत आरोप-प्रत्यारोपच्या फैरी झडत आहेत. तर महाविकास आघाडीचे नेते संजय पवार यांचा पराभव कसा झाला यावर विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे नेते देत आहेत. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीदेखील संजय पवार यांच्या पराभवावर नाराजी व्यक्त केली आहे. छोटे पक्ष आणि अपक्षांच्या नाराजीमुळे अपेक्षित मते मिळाली नाहीत असे ते म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> “यांना पहाटेची पापकृत्य करण्याची फार सवय आहे”, संजय राऊतांचा भाजपाला खोचक टोला!
महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक पक्षाचा कोटा ठरलेला होता. त्याप्रमाणे अपेक्षित मते आघाडीतील नेत्यांना मिळाली आहेत. मात्र काही छोट्या पक्षाची व अपक्षांची मते जी अपेक्षित होती ती आघाडीतील उमेदवार संजय पवार यांना मिळाली नाहीत. त्यांचीही काही नाराजी असणार. मात्र, यावर आघाडीतील ज्येष्ठ नेते चर्चा करतील, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>> राज्यसभा निवडणूक : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत झाले बाद; कायदेशीर लढा देण्याचा निर्णय
तसेत “शिवसेनेचे एक मत अवैध ठरले आहे. शिवाय अनिल देशमुख व नवाव मलिक यांना मतदानासाठी जामीन मिळाला नाही. त्यामुळे त्याचाही फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५१ मते होती. मात्र आमचा ४२ मतांचा कोटा ठरला होता. तरी मला एक मत जास्त मिळाले. ४३ वे मत कुठून मिळाले याचा शोध घ्यावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच ज्येष्ठ मंत्र्यांची ९ मते ही संजय पवार यांना मिळाली. राज्यसभा निवडणुकीची आणि विधान परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया वेगळी आहे. मात्र आता लवकरच होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत अधिक लक्ष देऊ,” असेही पटेल म्हणाले.