धनगर समाजाला भारतीय राज्यघटनेनुसार आरक्षण मिळाले पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने मंगळवारी भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागणीचे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय िशदे यांना देण्यात आले. आरक्षणाबाबत १५ ऑगस्टपूर्वी योग्य निर्णय न घेतल्यास येत्या विधानसभेत आघाडी सरकारला जागा दाखवू, असा इशारा विलासराव वाघमोडे यांनी दिला आहे.
गेल्या पंधरवडय़ापासून धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन केले जात आहे. रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण येथे आले असता त्यांच्यासमोर निदर्शने करण्यात आली होती. त्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याची पूर्तता न झाल्याने मंगळवारी धनगर समाजाने मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चात सहभागी होण्यासाठी दसरा चौक येथे धनगर समाजातील हजारो कार्यकत्रे जमले होते. भरपावसात मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या हातात पिवळे झेंडे, आरक्षण जाहीर करण्याचे फलक होते. डोक्यावर ‘मी धनगर व आरक्षण’ लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या, तसेच धनगरी ढोलही यामध्ये समाविष्ट करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. ‘नको आम्हाला कोणाचं आरक्षण द्या आम्हाला आमच्या हक्काचं’, ‘धनगर समाज आरक्षण जाहीर झालंच पाहिजे’, ‘येळकोट, येळकोट जय मल्हार’ अशा जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष बाबुराव हजारे, अशोक कोळेकर, रामचंद्र डांगे, कल्लाप्पा गावडे, राजेंद्र कोळेकर, संदीप कारंडे, नागेश पुजारी, बाबासाहेब सावगावे, प्रा. लक्ष्मण करपे, मिच्छद्र बनसोडे, प्रा. विठ्ठल बन्ने, रामप्पा कारिगार, धाऊ लांभोर, हरि विठ्ठल पुजारी, बापूसाहेब पुजारी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
   घटनेतील कलम ३४२ नुसार अनुसूचित जमातीमध्ये धनगर जमातीची केलेली तरतूद योग्य असून त्याआधारेच शासनाने धनगर समाजाला सवलती द्याव्यात. काकासाहेब कालेलकर व रेणके आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार आरक्षण जाहीर करावे. महाराष्ट्रातील धनगर आणि धनगड जमात एकच असून आम्हाला कोणाचे तरी काढून आरक्षण न देता घटनेने दिलेले आरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.