पंढरपूर : भाजप हा पूर्वी भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारीमुक्त अशा विचारधारेने चालणार पक्ष होता. मात्र, आता पूर्वीचा भाजप राहिला नाही. ज्या लोकांवर भाजपनेही आरोप केले असे ९० टक्के बाहेरचे लोक भाजपमध्ये आहेत, अशी खरमरीत टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. मात्र, मी आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, हे अभिमानाने सांगतो असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे हे येथील विठ्ठल दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पूर्वाश्रमीच्या भाजपा पक्षावर सडकून टीका केली. पूर्वी भाजपाची विचारधार वेगळी होती.
एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर तातडीने मंत्रिपदाचा राजीनामा घेतला होता. मात्र, आता जेलमध्ये जाऊन आलेले किंवा ईडी चौकशीत अडकलेले लोक पक्षात घेतले जात आहेत. अगदी दाऊदचा हस्तक असलेला सलीम कुत्ता सोबत नाचणाऱ्या सुधाकर बडगुजरला देखील भाजपमध्ये घेतले आहे. आज भाजपमध्ये ९० टक्के लोक बाहेरचे असून, विविध आरोप झालेले असल्याची टीका खडसे यांनी केली.
ज्या भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात मी विरोधी पक्षनेता असताना टीका केली होती ते आज पक्षात आहेत. सत्तर हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, तेही आज यांच्यासोबत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. भाजप हा विषय माझ्यासाठी पूर्णपणे संपला आहे. अंधारात असताना मला साथ देणाऱ्या शरद पवार यांच्याच सोबत मी असणार असल्याचा पुनरुच्चार खडसे यांनी केला.
भाजपच्या या अवस्थेला राज्याचे नेतृत्व जबाबदार आहे का, असे विचारले असता खडसेंनी प्रक्रियेत असणारे सर्व आणि पक्षात प्रवेश देणारे संघटनेचे नेते यास जबाबदार आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख टाळत फडणवीस यांची पाठराखण केली.
मी भाजपमध्ये असताना गिरीश महाजन माझा सामान्य कार्यकर्ता होता. मी मंत्री असताना त्याला मंत्रिमंडळात स्थान नव्हते. मी गेल्यावर तो कार्यकर्त्याचा मंत्री झाला, असे सांगितले. भाजपच्या विरोधात दोन ठाकरेंनी एकत्र आलेच पाहिजे याशिवाय सत्ताधाऱ्यांना विरोध करणाऱ्या सर्वांनी एकत्र आल्यास आगामी निवडणुकात चांगले यश मिळेल, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.