scorecardresearch

बाळासाहेब ठाकरे की आनंद दिघे, धक्कातंत्र कोणी शिकवलं? एकनाथ शिंदेंनी दिलं खास उत्तर; म्हणाले, “खरा धक्का…”

मागील वर्षात जून महिन्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली.

eknath shinde and anand dighe and balasaheb thackeray
एकनाथ शिंदे, आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मागील वर्षात जून महिन्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून पायऊतार व्हावे लागले. त्यानंतर आता राज्यात शिंदे गट आणि भाजपा युतीचे सरकार आहे. या नव्या सरकारचे प्रमुख एकनाथ शिंदे हे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे शिंदे यांचे राजकीय चातुर्याची चर्चेचा विषय ठरतोय. त्यांनी दिलेल्या धक्कातंत्रावरही तेवढीच चर्चा होते. यावरच आता शिंदे यांनी भाष्य केले आहे.

हेही वाचा >> ‘तीन दिवस एक मिनिटही झोपलो नाही,’ शिवसेनेतील बंडखोरीवर बोलताना एकनाथ शिंदेंचे विधान; म्हणाले “तेव्हा वेळच…”

मी कधीही कोणाला धक्का मारत नाही

एकनाथ शिंदे आज (२८ जानेवारी) ‘समृद्ध महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित आयोजित केलेल्या ‘सकाळ सन्मान’ या सोहळ्यात बोलत होते. यावेळी बोलताना मागील अनेक दिवसांपासून तुम्ही अनेक धक्के दिलेले आहेत. आठ ते दहा महिन्यात तुम्ही जबरदस्त धक्कातंत्र वापरलेले आहे. हे धक्कातंत्राचे शिक्षण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून की शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याकडून घेतले, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना “मी कधीही कोणाला धक्का मारत नाही. महाराष्ट्राला खरा धक्का २०१९ सालीच बसला. जनतेने भाजपा आणि शिवसेने यांच्या युतीला बहुमत दिले होते. तेव्हा हे सरकार स्थापन होईल अशी अपेक्षा होती. हाच खरा धक्का होता. त्यानंतर आता मागील सहा महिन्यांपासून आम्ही या धक्क्यातून सावरण्याचे काम केले आहे. आता जनता सावरत आहे,” असे शिंदे यांनी भाष्य केले.

हेही वाचा >> Video : राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी धनंजय मुंडेंचे रुग्णशय्येवरून जोरदार भाषण; म्हणाले, “मौत कल आती है, आज…”

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळंच बंद होतं

“एक वैचारिक भूमिका असते. जनतेच्या मनातलं भाजपा-शिवसेनेचं सरकार होतं. वैचारिक भूमिकेच्या आधारावरच आपलं काम चाललं पाहिजे. आम्ही जे केले ते करण्याची आवश्यकता होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळंच बंद होतं. करोना महासाथीचा प्रभाव होता हे मान्य आहे. मात्र सगळेच ठप्प होते. आमचे सरकार आल्यानंतर वातावरण बदलले. गोविंदा, गणपती, दिवाळी या सणांसाठी सर्व मर्यादा, बंधनं हटवून टाकले,” असेही शिंदे म्हणाले.

हेही वाचा >> ‘पंडित नेहरूंवर युरोप, इंग्रजांचा प्रभाव’; गोपीचंद पडळकरांचे विधान; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत म्हणाले…

दरम्यान, शिवसेनेतील आमदारांनी बंडखोर केल्यानंतर त्या काळात मी तीन दिवस एक मिनिटही झोपलो नाही. तो काळच तसा होता, अशी खास आठवण शिंदे यांनी सांगितली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 20:22 IST