शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय राऊत यांनी आगामी दोन दिवसात राज्याच्या राजकारणात गौप्यस्फोट होणार असल्याचं वक्तव्य केलं. यावर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच संजय राऊत गेल्या चार महिन्यांपासून गौप्यस्फोटाचा दावा करत आहेत, असंही शहाजीबापूंनी म्हटलं. ते सोमवारी (८ मे) सोलापूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
शहाजीबापू पाटील म्हणाले, “दोन दिवसात राज्याच्या राजकारणात मोठे गौप्यस्फोट होतील असं संजय राऊत चार महिन्यांपासून दररोज सकाळी बोलत आहेत. तसं झालं का? चार महिन्यांपासून बोलून बोलून त्यांची मान किती बारीक झाली आहे. ते एक दिवस बोलता बोलता चक्कर येऊन खाली पडणार आहेत.”
“नाना पटोले राजकारणातील कमी बुद्धीचा माणूस”
“मानदेशी भाषेत एक म्हण आहे की, ज्याला खालचं-वरचं कळत नाही, त्याला कारभारी केलं आहे. नाना पटोलेंना करगळी कुठं, नराळं कुठं, अकलुज कुठं याविषयी काहीही माहिती नाही. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदासाठी माणूस नसल्याने नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष केलं,” अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली.
“अतिशय कमी बुद्धी असलेली व्यक्ती काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष”
“दुर्दैवाने राजकारणातील अतिशय कमी बुद्धी असलेली व्यक्ती काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झाला आहे. हेच वास्तव आहे,” असा टोलाही शहाजीबापूंनी नाना पटोलेंना लगावला.