Shankarrao Chavan Government Hospital Nanded Deaths : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात २४ तासांत २४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ( २ ऑक्टोबर ) समोर आली. मृतांमध्ये ६ मुले आणि ६ मुलींचा समावेश आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तर, शिंदे सरकारवर सर्व स्तरातून टीकास्र सोडलं जात आहे.

विष्णुपुरी परिसरात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय आहे. रुग्णालयात गेल्या २४ तासांत ६ मुले व ६ मुली या १२ बालकांसह सात स्त्रिया आणि पाच पुरुष दगावले आहेत. मृतांमध्ये सर्पदंश, विषप्राशन तसेच अन्य आजारांचेही रुग्ण होते. यातील काही जण परराज्यातील असल्याचे सांगण्यात आलं.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दुर्घटनेबाबत माहिती घेतली जाईल. त्यावर जे काही उपाय आहेत, ते केले जातील,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

“परिस्थिती निश्चितच चिंताजनक”

या घटनेबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, “रूग्णालयाच्या अधिष्ठातांशी चर्चा केली आहे. परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे. वैद्यकीय महाविद्यालय असल्यानं शासनानं तातडीनं कारवाई आणि मदत करण्याची आवश्यकता आहे.”

“…तर ही धोक्याची घंटा आहे”

“आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सावंत अयशस्वी ठरत आहेत. सावंत यांच्यात हातात महाराष्ट्राच्या आरोग्य दिले, तर ही धोक्याची घंटा आहे. हे मुख्यमंत्र्यांनी समजून घेत फेरबदल करावे,” असे म्हणत शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या, सुषमा अंधारे यांनी तानाजी सावंतांना हटवण्याची मागणी केली.

हेही वाचा : “…हे मृत्यू योगायोग नक्कीच नाहीत”, नांदेडच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मृत्यूंना सरकार जबाबदार”

“ठाण्यातील महापालिका रूग्णालयात झालेल्या मृत्यूनंतर अन्य ठिकाणीही या घटना घडत आहे. कारण, हाफकिनकडून औषधांची खरेदी करण्यात आलेली नाही. अनेक वैद्यकीय आणि सरकारी रूग्णालयांत लोकांचा मृत्यू होत आहे. या मृत्यूंना सरकार जबाबदार आहे,” असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.