Eknath Shinde On Operation Sindoor : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने मध्यरात्री ‘एअर स्ट्राईक’ करत दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या हद्दीत एअर स्ट्राईक करत नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
भारतीय हवाई दलाने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशभरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत सूचक विधान केलं आहे. ‘मला वाटतं की हा फक्त एक ट्रेलर आहे. आणखी पुढे काय-काय होतंय ते पाहा. हा नवा भारत आहे’, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“‘ऑपरेशन सिंदूर’चं मी स्वागत करतो. भारतीय जवानांचं देखील मी अभिनंदन करतो. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील मी अभिनंदन करतो. पहलगामध्ये झालेला दहशतवादी हल्ल्यात आमच्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम झालं. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’हे महत्वाचं होतं. देशातील सर्वांच्या मनात बदल्याची भावना होती. भारताच्या तिनही दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ करत पाकिस्तानला जशात तसं उत्तर दिलं”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
“मला असं वाटतं की हा फक्त एक ट्रेलर आहे. आणखी पुढे काय काय होतंय ते पाहा. हा नवा भारत आहे. हा घुसून मारणारा भारत आहे. भारताने ९ दहशतवादी अड्डे उध्वस्त केले आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटकांना ज्या प्रकारे गोळ्या घालून मारलं ते पाहता भारताचे जवानही या दहशतवाद्यांना शोधून शोधून मारतील. भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चं जगभरातील सर्वच देशांनी स्वागत केलं आहे. त्यामुळे मी सांगतो की कोणीही भारताच्या नादी लागू नये. हे या कारवाईनंतर सिद्ध झालं आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
◻️LIVE | ?️ 07-05-2025
?मुंबई
? पत्रकारांशी संवाद https://t.co/PZ4LikAhfUThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 7, 2025
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उध्वस्त केले आहेत. या कारवाईचे संपूर्ण शुटिंग करण्यात आले असल्यामुळे यावेळी कुणाला पुरावा मागण्याकरता जागाच उरली नाही. मला असे वाटते की, सर्व भारतीयांकरिता अभिमानाचा असा हा दिवस आहे. आमच्यावर झालेला हल्ला भारत सहन करणार नाही. भारत योग्य पद्धतीने बदला घेईल, हे आपण दाखवून दिले आहे. ऑपरेशन सिंदूर हे नाव अधिक बोलके आहे, असे मला वाटते”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.