नेत्रदानाकडे सकारात्मकपणे पाहिलं जात असलं, ते करणाऱ्यांची संख्याही वाढत असली, तरी स्थिती अजूनही सुधारण्याची गरज आहे. नेत्रदानाबद्दल अजूनही गैरसमज असल्यामुळे हे प्रमाण वाढण्यात अडचणी येतात. दर वर्षी दीड लाख रुग्णांना नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची आवश्यकता असते, गेल्या वर्षी भारतात जवळपास ६२ हजार नेत्रपटलं जमा करण्यात आली असली, तरी जमा होणाऱ्या नेत्रपटलांपैकी अनकेदा केवळ ५० टक्केच प्रत्यारोपण शस्त्रक्रियेकरिता वापरण्यास योग्य असतात. ही दरी भरून काढण्यासाठी निरोगी नेत्रपटल मिळवण्याची गरज असते. त्यासाठी रुग्णालयात नेत्रपटल पुनर्प्राप्ती कार्यक्रम (हॉस्पिटल कॉर्निया रिट्रिव्हल प्रोग्राम) राबविले पाहिजेत. शहरात सरकारी किंवा निमसरकारी रुग्णालयांत होणाऱ्या मृत्यूंनंतर तेथे समुपदेशन करून नातेवाइकांना नेत्रदानाची माहिती दिली, तर तरुण आणि निरोगी नेत्रपटल मिळतील. कारण, स्वयंनेत्रदानाचे प्रमाण कमी तर आहेच, पण त्यात वृद्धांचे प्रमाण जास्त असते. निरोगी नेत्रपटल मिळण्याचे प्रमाणही कमी असल्यामुळे जनजागृतीची गरजच अधिक आहे.
नेत्रदानाविषयी गैरसमज काय आहेत?
सर्वांत मोठा गैरसमज म्हणजे या प्रक्रियेत डोळे पूर्ण काढले जातात. खरंतर नेत्रदात्याचा डोळा पूर्ण काढला जात नाही, तर फक्त नेत्रपटल काढले जाते. ते काढल्यानंतर डोळ्यांना कोणत्याही प्रकारची जखम होत नाही. याशिवाय नेत्रपटल प्रत्यारोपण करूनही दिसत नाही, असाही एक गैरसमज आहे. मात्र, अशा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया या यशस्वी होतात आणि त्यामुळे आजवर लाखो दृष्टिहीनांना दृष्टी मिळाली आहे. ठरावीक वयाच्याच लोकांनी नेत्रदान केले पाहिजे, असे नसून व्यक्तीची वैद्यकीय स्थिती पाहिली जाते. मधुमेह, रक्तदाब, मोतिबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीही नेत्रदान करू शकतात. हिपॅटायटीस-बी, हिपॅटायटीस-सी, एचआयव्ही, कर्करोगांसारखे काही गंभीर आजार सोडले, तर एक वर्षावरील कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते. शिवाय प्रशिक्षित डॉक्टरच नेत्रपटल काढू शकतात. त्यासाठी केवळ १०-१५ मिनिटे लागतात. यामुळे चेहरा विद्रूप होत नाही. पूर्ण मोफत असणाऱ्या या प्रक्रियेत दाता आणि ज्याच्यावर प्रत्यारोपण झाले अशा दोघांचीही ओळख गुप्त ठेवली जाते.
निरोगी डोळ्यांसाठी काय काळजी घ्यावी?
निरोगी डोळ्यांसाठी निरोगी शरीराबरोबरच सकस आहार आणि व्यायामाचीही गरज असते. स्क्रीन टाइम कमी करणे आणि संगणकावर काम करताना दर तासानंतरची मिनिटभराची विश्रांतीही डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यात महत्त्वाची आहे. त्यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो, डोळ्यांचे स्नायू मजबूत राहण्यास मदत होते. डोळ्यांची वेळोवेळी तपासणीदेखील तेवढीच गरजेची आहे. त्यामुळे काही समस्या असल्यास योग्य वेळी निदान होऊन पुढील गुंतागुंत टाळता येऊ शकते.
नेत्रदानाची प्रक्रिया कशी असते?
नेत्रदानाची इच्छा असणारी व्यक्ती आपल्या जवळच्या नेत्रपेढीत अर्ज करून ठेवू शकते. असा अर्ज केला नसला, तरी त्या व्यक्तीच्या मृत्युपश्चात नातेवाइकांच्या संमतीने नेत्रदान करता येते. त्या व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबातील सदस्य कोणतीही नेत्रपेढी किंवा नेत्र रुग्णालयाशी संपर्क साधू शकतात. नंतर सहा तासांच्या आत नेत्रपटल काढले जाते. तोपर्यंत नातेवाइकांनी मृत व्यक्तीचे डोळे उघडे असतील, तर ते बंद करावेत, डोळ्यांवर ओला कापूस ठेवून पंखा किंवा एसी सुरू असेल, तर तो बंद करावा.
काढलेल्या नेत्रपटलांचे आयुष्य किती असते?
नेत्रपटल काढल्यानंतर ते वेगवेगळ्या पद्धतींनी जतन केले जाते. काही विशिष्ट रासायनिक द्रव पदार्थांमध्ये (प्रीझर्व्हेशन मीडियम) ४ दिवसांपर्यंत आणि काहींमध्ये १४ दिवसांपर्यंत जतन केले जाते. त्यानंतर ज्या रुग्णांना नेत्रपटल खराब झाल्यामुळे अंधत्व आले आहे किंवा कमी दिसत आहे, अशा प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णाचे त्याच्या गरजेनुसार खराब नेत्रपटल काढले जाते आणि राष्ट्रीय अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्थेच्या (एनओटीटीओ) निर्देशांनुसार, नवीन नेत्रपटलाचे प्रत्यारोपण केले जाते. यात एका नेत्रदात्यामुळे दोन दृष्टिहीनांना दृष्टी मिळते. यासाठी सध्या प्रतीक्षेचा कालावधी किमान दोन महिन्यांचा आहे. एच. व्ही. देसाई नेत्रपेढीमार्फत आजवर ६ हजार ७६६ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यातील अनेक रुग्णांना दृष्टी प्राप्त झाली आहे.