धुळे – जिल्ह्यात वेगवेगळ्या चार कारवायांमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे २२ लाख रुपयांचे बोगस बियाणे जप्त केले. या बियाण्यांना भारतात लागवडीची परवानगी नाही. सर्व बोगस बियाणे गुजरातमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणले जात होते, अशी माहिती कृषी विभागातील जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी दिली.

सध्या राज्यात मान्सून दाखल झाल्याने पेरणीसाठी लगबग सुरु आहे. शेतकऱ्यांकडून कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यासाठी त्यांच्याकडून बियाण्यांची प्रचंड प्रमाणात मागणी असते. त्यामुळे बोगस बियाण्यांची तस्करी वाढते. त्यावर आळा घालण्यसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप यांनी विविध पथके तैनात केली आहेत. त्यातील जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, उल्हास ठाकूर, मनोजकुमार सिसोदे, जगदीश बोराडे, मनोज पाटील, नितीन मासुळे यांच्या पथकाने जिल्ह्यातील वेगवेगळ्या चार ठिकाणी कारवाई केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिरुड-बोरकुंड चौफुली येथे वाशिम येथून बोगस बियाणे घेऊन येणाऱ्या एकास ताब्यात घेतले. त्याच्या मोटारीतून बोगस बियाण्यांची पाकिटे जप्त केली. तसेच गुजरात राज्यातून येणाऱ्या सर्व खासगी वाहनांची तपासणी करुन तीन खासगी बसमधून प्रत्येकी ५०, १२० आणि एक हजार २०० अशी एकूण २० लाख रुपयांची बोगस बियाण्यांची पाकिटे जप्त केली. बोगस बियाणे आणणाऱ्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असे तायडे यांनी सांगितले.