Former Maharashtra CM Ashok Chavan Resigned from Congress : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी पुढील वाटचालीबाबतचा निर्णय अद्याप जाहीर केला नसला तरी ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. स्वतः अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याचे कोणतेही कारण विशद केलेले नसले तरी त्यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी अमर राजूरकर यांनी मात्र माध्यमांशी बोलताना खंत व्यक्त केली. विशेष म्हणजे चव्हाण यांच्या पाठोपाठ राजूरकर यांनीही आपल्या पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊ केला आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी एक पक्ष संघटनेवर मोठा आरोप केला.
Ashok Chavan Resigned: “आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपात”, उद्धव ठाकरे काय म्हणाले?
काय म्हणाले अमर राजूरकर?
“महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये गटबाजीला प्रोत्साहन देण्याचे काम सध्या सुरू आहे. काँग्रेसच्या संसदीय मंडळामध्ये ५२ लोक आहेत. त्यात मीदेखील आहे. पण इतर अनेक आमदारांचा त्यात समावेश नाही. स्वतःच्या मतदारसंघात ज्यांची अनामत रक्कम जप्त झाली, असे काही कार्यकर्ते अध्यक्षांच्या पुढे पुढे करतात. त्यांना अध्यक्षांनी महत्त्वाचं स्थान दिलं आहे. त्यामुळे बरेचसे आमदार नाराज आहेत”, असा आरोप राजूरकर यांनी पक्षसंघटनेवर केला.

राजूरकर पुढे म्हणाले की, “मी अशोक चव्हाण यांचा कार्यकर्ता आहे. त्यांनी मला शून्यातून उभं केलं. त्यांनी राजीनामा दिला, त्यामुळं मीदेखील राजीनामा दिला आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये ज्यांना स्थान दिले, त्यांची वॉर्डातही निवडून येण्याची पात्रता नाही. त्यांना संसदीय मंडळावर घेतलं आहे. जे लोकांमधून निवडून आले, त्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे बरेचसे आमदार नाराज आहेत, अशी माहिती माजी आमदार अमर राजूरकर यांनी दिली.”
एक-दोन दिवसांत सर्व सांगतो – अशोक चव्हाण
दरम्यान अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना राजीनाम्याबाबत सांगितले की, मी विधानसभा अध्यक्षांना भेटून काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये असताना नेहमीच प्रामाणिकपणे काम केलं. मला कोणाबद्दल कसलीही तक्रार करायची नाही, राजीनामा देण्यामागे कुठलीही व्यक्तीगत भावना नाही. माझी पुढची राजकीय दिशा काय असेल याबाबत निवेदन निश्चित करेन. एक ते दोन दिवसांत तुम्हाला सर्वकाही सांगेन.