औरंगाबाद या शहराचे नाव संभाजी नगर करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होते आहे. शिवसेनेने ही मागणी लावून धरली आहे. मात्र या मागणीवर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. आता या संदर्भात विक्रांदचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले आहे. भाजप आणि शिवसेनेची सत्ता असताना शहरांचे नामांतर होत नाही फक्त राजकीय मुद्दा म्हणून नामांतराचा वापर होतो. हे राजकारण थांबले पाहिजे आणि या मागणीचा विचार झाला पाहिजे असे निदर्शनास आले आहे. औरंगाबाद शहरापासून १५ ते २० किलोमीटर अंतरावर वाळूज एमआयडीसी आहे. तसेच या भागात अनेक गावेही आहेत. सिडकोसारखी टाऊनशिप उभी करण्याचा प्रयत्न झाला पण सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्याचमुळे या परिसराला नव्या महापालिकेचा दर्जा द्यावा आणि नव्या महापालिकेला संभाजी नगर असे नाव द्यावे अशी मागणी पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जर हा प्रस्ताव मान्य केला तर अनेक प्रश्न सुटू शकतात असेही पवार यांनी म्हटले आहे. ठाणे शहराच्या बाजूला मीरा भाईंदर, वसई-विरार, कल्याण डोंबिवली, पनवेल, भिवंडी, पिंपरी चिंचवड अशा महापालिका आहेत. त्याचप्रमाणे वाळूज परिसराला महापालिकेचा दर्जा द्यावा ज्यामुळे इथे विकास होईल असेही पवार यांनी म्हटले आहे. या नामांतराच्या मुद्द्यावरूनच चंद्रकांत खैरे आणि रामदास कदम यांच्यात गेल्याच आठवड्यात वाद रंगला होता. आता उत्तमसिंह पवार यांनी मात्र या प्रश्नावर वेगळाच तोडगा काढून मुख्यमंत्र्यांना या संदर्भातले पत्रच लिहिले आहे.