सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या ५०० कोटी रुपयांच्या निधीचा योग्य वापर न झाल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी खंत व्यक्त केली. रेल्वेमंत्री असताना कोकण रेल्वेला योग्य दिशा दिली आणि वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद केली, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी सांगितले. कोकण रेल्वेच्या समस्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी येथील अपूर्ण रेल्वे टर्मिनसच्या संदर्भात विचारले असता, सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेच्या विकासाकडे होत असलेल्या दुर्लक्षावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “मी रेल्वे मंत्री झालो तेव्हा कोकण रेल्वेला २५ वर्षे पूर्ण झाली होती. परंतु, ती रेल्वे शेडमध्येच पडून होती. मी तिला मुख्य प्रवाहात आणले. १३ नवीन स्थानके बांधून प्रवाशांना चांगल्या सुविधा दिल्या. दुपदरीकरणाचे कामही पूर्ण केले. मात्र, वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी रेल्वे अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद झालेला ५०० कोटी रुपयांचा निधी खर्च न होणे दुर्दैवी आहे.
सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेच्या निर्मितीतील स्थानिक लोकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांनी जमिनी दिल्यामुळेच कोकण रेल्वे साकार झाली. अन्यथा, हे शक्य झाले नसते. त्यामुळे कोकण रेल्वेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.सावंतवाडी रेल्वे टर्मिनससह कोकण रेल्वेच्या विविध समस्यांबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले. “कोकण रेल्वे ही सामान्य माणसांची रेल्वे आहे आणि तिच्या विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.