लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या आवारात गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करून दीड वर्ष उलटले. मात्र, त्याच्या अनावरणाचा मुहूर्त ठरत नसल्याने तो झाकून ठेवावा लागत आहे. पूर्ण झालेल्या या पुतळ्यावर घातलेले पहिले आवरण जीर्ण झाल्याने आता नवीन आवरण घातले गेले. मात्र, मुहूर्ताअभावी या पुतळ्याचे अनावरण मात्र रखडले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या लातूरमधील पुतळ्याची ही व्यथा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या आवारात विलासराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. शरद पवारांच्या हस्ते त्याचे अनावरण झाले. पंकजा मुंडे याही त्या कार्यक्रमास उपस्थित होत्या. त्यानंतर जिल्हा परिषदेत विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांची मैत्री आगळीवेगळी होती. रेणापूर मतदारसंघ हा लातूर जिल्ह्यातील. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा पूर्णाकृती पुतळा जिल्हा परिषदेच्या आवारात उभा करण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे असताना झाला. त्यासाठी जागा निश्चित झाली, निधी मिळाला, पुतळा उभा करण्यात आला. भूमिपूजनाचा शानदार कार्यक्रम करण्यात आला. मात्र, पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यक्रम करू, या नादात तो तसाच राहिला.
सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. पंकजा मुंडे याही राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत. ३ जून ही गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आहे. त्यापूर्वी तरी या पुतळ्याचे अनावरण होणार का, असा प्रश्न केला जात आहे. सध्या जिल्हा परिषदेत प्रशासकीय राज्य आहे. त्यामुळे कोणी पाठपुरावा करणारा नाही. भाजपचे जिल्ह्यात तीन आमदार असतानाही जो तो आपापल्याच कामात मग्न असल्यामुळे पुतळ्याच्या अनावरणाकडे कोणाचेच लक्ष नाही, अशीही चर्चा आता सुरू आहे.