कराड : पश्चिम घाट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून, अनेक ठिकाणी तुफान पाऊस होत आहे. कोयना धरणातही पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणातील जलआवक थेट दुपटीने वाढताना, धरणसाठा जवळपास ४१ अब्ज घनफूट (३८.९५ टक्के) झाला आहे. सातारा जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांचा जलसाठा ४० वरून ४३ टक्क्यांपर्यंत झेपावला आहे.
सातारा जिल्ह्यातील कोयना, धोम, कण्हेर, धोम-बलकवडी, उरमोडी आणि तारळी या प्रमुख धरणांमध्ये ६३.९६ अब्ज घनफूट (४३ टक्के) जलसाठा झाला आहे.आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ३३ तासांत कोयना पाणलोटातील कोयनानगरला १३३ मिमी (एकूण १००४), नवजाला १३५ मिमी (एकूण १०१४) तर, महाबळेश्वरला १५५ मिमी (एकूण ९९५) पावसाची नोंद आहे. कोयना धरण क्षेत्रातील पावसाचा रात्रीचा जोर आणि दिवसाची ओढ असा सूर कायम आहे. गेल्या २४ तासांत कोयना धरणातील जलआवक १६,५५३ घनफुटांवरून (क्युसेक) ३१,२५२ घनफुटांपर्यंत झेपावली आहे. मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या कालावधीत पश्चिम घाटातील वाकी येथे सर्वाधिक १०४ मिमी, खालोखाल सावर्डे येथे ९८ मिमी, जांभूरला ८९ मिमी, निवळे येथे ७५ मिमी, सांडवली येथे ५७ मिमी, बामणोली येथे ५०, ठोसेघर धबधबा ४९ मिमी, कडवी धरण ४४ मिमी, कास तलाव ४३ मिमी यासह अन्य ठिकाणीही जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे.
बळीराजा हवालदिल
एकंदर पावसाने पाण्याचा सुकाळ दिसत असला, तरी मान्सूनपूर्व पावसाचे तुफान बरसणे आणि त्यानंतर मोसमी पावसाचाही जोर यामुळे शेतशिवारात चिखल अन् पाणीच पाणी असल्याने खरिपाचा पेरा रखडला आहे. या सलग पावसाने काही काळासाठी उसंत घेतल्यास सुरुवातीला मुरमाड आणि निचऱ्याच्या जमिनीवर पेरणी शक्य होईल. परंतु काळी माती, लाल मातीचे मळीचे क्षेत्र, तसेच सखल भागातील क्षेत्रावर पेरण्या, टोकण्यांना शिवारातील दलदल आणि मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे बळीराजा व सामान्य जनताही हवालदिल झाली आहे.