भाजपा नेते व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी काही दिवासांपूर्वी राज्यातील महाविकासआघाडी सरकार हे मार्चपर्यंत पडेल व राज्यात भाजपाची सत्ता येईल, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर बऱ्यापैकी खळबळ माजली होती. शिवाय, राजकीय नेते मंडळींकडून यावर प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. महाविकास आघाडीमधील तिन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी देखील राणेंच्या या विधानाला प्रत्युत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या विशेष मुलाखतीत नारायण राणेंच्या या विधानावरून त्यांना टोला लगावल्याचं दिसत आहे.

नारायण राणेंच्या राज्यातील सत्ताबदलाबाबतच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांची हसून प्रतिक्रिया, म्हणाले…

“आतापर्यंत दोन वर्षात दहा-बारा वेळेस सरकार पडण्याबाबत तारखा देण्यात आल्या. आता नारायण राणे यांनी असं सांगितलं आहे की मार्चपर्यंत सरकार पडेल, मी त्यांचे आभार मानतो कारण तीन महिन्यांचा कालावधी त्यांनी आमच्या सरकारला दिलेला आहे. म्हणजे भरपूर वेळ दिलेला आहे. त्यामुळे अशा डेडलाईन किती आल्या किती गेल्या तरी जे ज्यावेळी व्हायचं त्यावेळी होणार आहे. कुणी म्हणतं म्हणून होऊ शकत नाही आणि जनतेची जोपर्यंत इच्छा आहे, जसं श्रींची इच्छा आहे तोपर्यंत आमचं राज्य सुरू राहणार.” असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

याचबरोबर, “आमचं सरकार पडावं म्हणून ज्यांनी देव पाण्यात घातलेले आहेत. त्यांच्याकडून काही गोष्टी मदत करून पुढे आणलेल्या असाव्यात, अशी आमची शंका आहे. अनिल देशमुख किंवा जितेंद्र आव्हाड यांचा प्रश्न असेल, मला वाटतं काही विषय नसताना त्याचा मुद्दा बनवला गेला. अनिल देशमुखांबाबतचं सगळं प्रकरण हे महाराष्ट्र सरकारमधील एका मंत्र्याला बदनाम करण्यासाठीचं होतं हे आता जवळपास सिद्ध व्हायला लागलं आहे. ज्यावेळी अनिल देशमुखांवर आरोप झाले तेव्हा पक्षाचं नुकसान झालं मात्र आता सगळे मळभ दूर होत आहेत. आज त्यांच्याविरोधात कुठलीही गोष्ट सिद्ध होत नाही, म्हणून त्यांच्या मुलाने कुठे कंपनी काढली, काय काढली? याच्या तपशीलात जाणे हे योग्य नाही. एखाद्याचा वचपा काढायचा आहे म्हणून जर कुणी त्याच्या मागे लागले असेल तर हे बरोबर नाही. महाराष्ट्रात असं राजकारण यापूर्वी कधी झालेलं नाही. सरकार पाडलं पाहिजे हा हट्ट काही लोकांनी मनाशी धरला आहे.” असंही यावेळी जयंत पाटील म्हणाले.

नारायण राणेंच्या राजकीय भविष्यवाणीला नाना पटोले, नवाब मलिक आणि अनिल परब यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

तसेच, “नवाब मलिक हे पुराव्यानिशी बोलत आहेत म्हणून आमच्या पक्षाचा पूर्ण पाठींबा आहे. ते सर्व कागदपत्र, पुरावे एकत्र करून बोलत आहेत. जे सत्य आहे ते जर बोलत असतील तर पक्ष त्यांच्या पाठीशी राहणारचं. राज्य मिळवण्यासाठी किती स्तरावर जायचं आणि कुणाचं व्यक्तिगत नुकसान करायचं, चारित्र्याचं आणि त्या व्यक्तिबाबत जे हणण होतं. तो काळ एवढा मीडियासमोर जातो आणि त्याचा जो खुलासा आहे तो एवढ्या प्रभावीपणे दाखवला जात नाही. राष्ट्रवादी हा या महाराष्ट्रात सर्वात आक्रमकपणे काम करणार पक्ष आहे आणि समोरच्यांना आमची भीती जास्त वाटते.” असंही जयंत पाटील यावेळी बोलून दाखवलं.

“सरकार पाडून नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित…”, नारायण राणेंची नवी राजकीय भविष्यवाणी

“लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. माझ्या आतमध्ये जी गोष्ट आहे ती आत्ताच बाहेर सांगायची नाहीये. एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. अशा ठिकाणी काही बोललो तर आणखी एखादा महिना पुढे ढकलेल.” असं नारायण राणे म्हणाले होते.