भाजपा नेते किरीट सोमय्या हे दापोलीत दाखल झाले आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्ट प्रकरणावरुन त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यात यावे म्हणून सोमय्या दापोलीत दाखल झाले आहेत. यावरुन आता अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले असून हिंमत असेल तर रिसॉर्ट पाडून दाखवा असे आव्हान किरीट सोमय्या यांना दिले आहे.

हे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे आणि शिवसेना नेते अनिल परबांच्या मालकिचे आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्या रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी सोमय्या दापोलीत दाखल झाले. मात्र शिवसेनेकडूनही किरीट सोमय्या यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून अनिल परब हे रिसॉर्ट माझं नाही असे सांगत आहेत. याबाबत ज्या चौकशा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. मी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे, असेही अनिल परब यांनी म्हटले आहे.

“हे रिसॉर्ट माझा नाही. याबाबत चौकश्या झाल्या आहेत. वेगवेगळ्या यंत्रणांकडून सर्व कागदपत्रे तपासून झाली आहेत. हे रिसॉर्ट माझे नाही हे मी वारंवार सांगितले आहे आणि त्याबाबत कोर्टात याचिका दाखल केली आहे. किरीट सोमय्या हे माझे रिसॉर्ट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे त्यांनी कागदोपत्री सिद्ध करावे. किरीट सोमय्या पालिकेचे नोकर आहेत का ते कारवाई करुन तोडण्यासाठी जाणार आहेत. एखादी अनाधिकृत गोष्ट असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा पालिकेला अधिकार आहे. किरीट सोमय्या वातावरण खराब करत आहेत. कोकणात काम करणारे आहेत ते भयभीत झालेले आहेत, त्यांनी पोलिसांना तक्रार केली आहे,” असे अनिल परब म्हणाले.

“कारवाई झाली नसेल तर ज्या संस्था हे काम पाहतात त्यांचेच हे काम आहे. किरीट सोमय्या त्या संस्थेचे कर्मचारी नाहीत. ते कसे बोलू शकतात मी तोडणार म्हणून आणि हिंमत असले तर त्यांनी तोडून दाखवावे. ते फक्त नौटंकी करत आहेत. मी तिथला पालकमंत्री असल्याने हॉटेलवाल्यांच्या व्यवसायवर आक्रमण करण्यात येत आहे. रिसॉर्ट परवानगी घेऊन बांधले नसेल तर त्यावर कारवाई होईल. पण त्याच्यासोबत माझे नाव जोडून वातावरण खराब करण्याचे काम सोमय्या करत आहेत,” असे अनिल परब म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कोर्टात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. माझा संबंध नसताना वारंवार आरोप करन प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने हायकोर्टात जाणार आहे. कायदेशीर परवानगी घेऊन बांधकाम झाले असेल तर परवानगी ज्यांनी दिली त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी,” असेही अनिल परब म्हणाले.