अलिबाग : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वरसे येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याची ३ एकर परिसरावर भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या महा रांगोळीची विश्वविक्रमात नोंद व्हावी यासाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून, या निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून रोहा तालुक्यातील वरसे येथील भुवनेश्वर मैदानावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची महा रांगोळी साकारण्यात आली आहे. १ लाख २५ हजार स्क्वेअर फूट परिसरात ही भव्यरांगोळी काढण्यात आली आहे. यासाठी गेली सहा दिवस शंभरहून अधिक रांगोळीकार दिवसरात्र मेहनत घेत होते. शुक्रवारी ही रांगोळी शिवभक्तांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली.

हेही वाचा : “लोकसभेच्या बदल्यात लॉलीपॉप”, रामदास कदमांच्या मुलाच्या MPCB वरील नियुक्तीवरून काँग्रेसचा टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. यावेळी शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. राज्यातील विविध भागातून ही रांगोळी पाहण्यासाठी शिवभक्त या निमित्ताने दाखल झाले होते. या सोहळ्यानिमित्त एम. बी. पाटील स्कूल ते भुवनेश्वर मैदानादरम्यान मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात हजारो शिवभक्त यात सहभागी झाले होते. नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जाज्वल्य इतिहास सदैव प्रेरणा देत राहावा हाच या महारांगोळी मागचा उद्देश असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले