वाई : जिथे पक्षाची ताकद आहे तेथे पक्ष लोकसभा विधानसभेच्या जागा मागणार आहे, असं सांगत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पक्ष वाढीसाठी आम्हाला कोणाशीही कोणताही वाद घालायचा नाही, तर आमची ताकद सिद्ध करायची आहे, असे सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सातारा येथील दूध संघाच्या कार्यालयात झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कार्याध्यक्ष अमित कदम, सरचिटणीस निवास शिंदे आदी उपस्थित होते.

रामराजे म्हणाले,मराठ्यांना आरक्षण देण्याचा विचार सरकार पातळीवर सुरु आहे. पक्ष फुटीचा भाजपाला फायदा होणार नाही. आमचा पक्ष प्रमुख पक्ष आहे, जी ताकद आहे ती तशीच ठेऊन पक्ष वाढवण्यावर भर राहील. भाजप लोकसभा विधानसभेच्या तयारीत असताना आम्ही आमच्या जागा सोडणार नाही. जागा वाटप याबाबत आघाडीची चर्चा अद्याप झालेली नाही. जागा वाटप हा प्रश्न राज्य पातळीवरील आहे आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद आहे, हे विसरून चालणार नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : “शिका, नेतृत्व करा आणि बदल घडवा या ब्रीदवाक्यानुसारच आम्ही कार्यरत”, शरद पवार यांच्यासमोर अजित पवार यांची टिप्पणी

जिल्ह्यात पाऊस कमी झाला आहे. काही तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धता आणि मागणी याचे सर्वेक्षण झाले आहे. त्यामुळे कोणत्याही तालुक्यात व लोकप्रतिनिधींमध्ये पाण्यावरून वाद होणार नाही. शासन त्याबाबत धोरण ठरविणार आहे. त्याप्रमाणे कोणावरही अन्याय होऊ न देता समन्यायी वाटप होईल असा निर्णय घेतला जाईल. माण-खटाव, फलटण येथे पाण्याचे मोठेसंकट असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा : पवार काका-पुतण्या अंतर राखूनच, दौंड येथील कार्यक्रमात शरद पवार-अजित पवार शेजारी का बसले नाहीत?

पक्ष आणि चिन्हाचा वाद न्यायालयात सुरु आहे. जिथे पक्षाची ताकद आहे. तेथे पक्ष लोकसभा विधानसभेच्या जागा मागणार आहे. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाकडे काय चाललंय म्हणून आम्ही आमची भूमिका ठरवणार नाही.आमचा पक्ष साताऱ्यातील प्रमुख पक्ष आहे. कार्यकर्त्यांना अपेक्षित निर्णय घेऊन जिल्ह्यात संघटन करण्यावर, कार्यकर्त्यांना ताकद देण्यावर आमचा भर राहील. आज प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली असून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. मंत्री पदाची लवकरच चांगली बातमी जिल्ह्याला दिली जाईल असेही रामराजे म्हणाले.

हेही वाचा : VIDEO: पुण्यात चालकाने बस रिव्हर्स चालवत अनेक वाहनांना उडवलं; सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार मकरंद पाटील म्हणाले, साखर कारखान्यांच्या थक हमीचा सरकारमध्ये विचार झाला आहे. खंडाळा व किसन वीरचा प्रस्ताव दाखल केला आहे. किसन वीरला मदत झाल्यास त्याचा फायदा सभासदांना व कारखान्याला होणार आहे . पत्रकार परिषदेपूर्वी झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीला मोठी गर्दी होती.