सोलापूर : मराठा आरक्षण प्रश्नावर उद्या आंतरवली सराटीमध्ये महत्वाची बैठक होणार असून त्यात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या आठ-दहा मुद्यांवर भूमिका ठरविली जाणार असल्याची माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिली. करमाळा तालुक्यातील दिवे गव्हाण येथे आयोजित सभेत जरांगे-पाटील बोलत होते. उद्या आंतरवली सराटीत होणाऱ्या बैठकीत राज्यभरातील मंडळी हजारोंच्या संख्येने हजर राहणार आहेत. ही बैठक मराठा आरक्षण आंदोलन पुढे नेण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. हेही वाचा : कृषीचा क्षेत्राचा अनुदानित युरिया उद्योगासाठी, ३८ लाखाचा साठा जप्त दिवे गव्हाणमध्ये झालेल्या सभेची मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती. परंतु जरांगे-पाटील यांनी पुढे आंतरवली सराटीमध्ये रात्रीपर्यंत पोहोचायचे असल्याचे कारण देत आपले भाषण आटोपते घेतले. यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याच्या आरोपाचा पुनरूच्चार केला. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात पूरक निर्णय महायुती शासनाकडून घेतला जाण्याची अपेक्षा होती. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अखेरच्या क्षणी दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. उलट, मराठा समाजाची शासनाने फसवणूक केल्याचे दिसून आल्याचे भाष्य करताना जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली.