गेले अनेक दिवस मुंबई शहर, तसेच उपनगरांत ऑक्टोबरमधील उकाड्याचा प्रभाव दिसून आला. गरम हवा, आर्द्रतेमुळे होणारी काहिलीमुळे नागरिक त्रस्त होते. मात्र, आता मुंबईतील किमान तापमानात घट झाल्यामुळे पहाटे वातावरणात गारवा जाणवू लागला. मुंबईशिवाय पुणे, कल्याण, ठाणे या पट्ट्यातही दोन दिवसांपासून तापमान खाली आलं आहे. राज्यातील इतर भागातही थंडीचं वातावरण अनुभवायला मिळत आहे.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी २५.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची, तर सांताक्रुझ केंद्रात २२.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

मुंबईमधून मोसमी पाऊस माघारी गेल्यानंतर नागरिकांना सतत उकाडा सहन करावा लागत होता. तसेच कमाल तापमानातही सरासरीपेक्षा वाढ झाली होती. मात्र आता दोन दिवसांपासून तापमान खाली आल्याने थंडीची चाहूल लागली आहे.

राज्यात नोव्हेंबरपासून थंडीची तीव्रता वाढणार

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे सांगितले आहे. अरबी समुद्रात “तेज” चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागरात “हमून” चक्रीवादळ तयार झाले आहे. २०१८ नंतर प्रथमच एकाच वेळी दोन चक्रीवादळांची निर्मिती झाली आहे. हवामान खाते यावर लक्ष ठेवून आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर आणि गुजरातवर कोणताच विपरीत परिणाम होणार नसल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. गुजरातमध्ये आगामी काही दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. महाराष्ट्रातही या चक्रीवादळाचा कोणताच परिणाम होणार नसल्याचे सांगितले आहे.