सोलापूर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला केल्यानंतर त्यास प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर जोरदार हल्ला केला आहे. खरे तर ही सुरुवात आहे. वाघाने आता केवळ पंजा दाखवला आहे. अजून जबडा काढला नाही, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर आता ताब्यात घ्यावा आणि तमाम भारतीयांची इच्छा सफल करावी, अशी अपेक्षाही कदम यांनी व्यक्त केली.

योगेश कदम हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर भारतीय लष्कराने परिणामकारक हल्ला केल्याबद्दल समाधान व्यक्त करीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह भारतीय लष्कराचे अभिनंदन केले. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कराला पूर्ण मोकळीक दिली आहे. अशी मोकळीक यापूर्वीच्या कोणत्याही पंतप्रधानांनी दिली नव्हती, असा दावा कदम यांनी केला.

पाकिस्तानकडून केवळ भारताच्या विरोधात नव्हे, तर जगभरातील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिले जाते, हे पुनः पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यामुळेच आता भारतीय लष्कराने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर चीनने सुद्धा पाकिस्तानविषयी ममत्व बाळगले नाही. अमेरिकेलाही आपल्या बाजूने वळवून घ्यायला पंतप्रधान मोदी हे यशस्वी झाले आहेत. आता पाकिस्तानचा नायनाट करण्याची, विशेषतः पाकव्याप्त काश्मीर भारताने ताब्यात घेण्याची वेळ आली आहे. यात पंतप्रधान मोदी यांना निश्चित यश मिळेल, असा दावाही कदम यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या कार्यालयात ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे सक्रिय झाल्याबद्दल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. या वेळी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत आदी उपस्थित होते.