सांगली : पावसाचा जोर ओसरला असला तरी थांबून थांबून होणाऱ्या सलग पावसाने ओढे, नाले मे महिन्यातच तुंडूब भरून वाहू लागले आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३८ मिलीमीटर पाऊस खानापूर मंडळात नोंदला गेला असून, जिल्ह्यात सरासरी १४.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
गेले दहा दिवस सलगपणे सुरू असलेल्या पावसाने मंगळवारी दुपारनंतर उसंत घेतली असून, पावसाचा जोरही कमी झाला आहे. तरीही सततच्या पावसाने सगळीकडे ओलावा निर्माण झाला असून, रानात साचलेले पाणी अद्याप कायम आहे. पहाटेपासून दुपारपर्यंत रिमझिम सुरूच होती. मात्र, दुपारनंतर सांगली व मिरज शहरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी ढगाळ हवामान कायम आहे. कधीही पावसाची सर येऊ शकते, असेच वातावरण सध्या तरी आहे.
सलग पावसाने कडेगाव, पलूस आणि तासगाव तालुक्यातून वाहणाऱ्या येरळा व नांदणी नद्यांना पूर आले असून, यामुळे कडेगाव व तासगाव तालुक्यातील पाच जिल्हा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रानात पाणीच पाणी झाले असल्याने खरीप पेरणीच्या तयारीची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. भाजीपाला, द्राक्ष, आले या पिकांना या पावसाचा फटका बसला आहे.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १४.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, तालुकानिहाय झालेला पाऊस असा- मिरज १३, जत २१.५, खानापूर २०.९, वाळवा ९.८, तासगाव १८.७, शिराळा ८.७, आटपाडी ३८.१, कवठेमहांकाळ १५.६, पलूस ६.९ आणि कडेगाव ८.५ मिमी.