Raigad Khalapur Landslide : खालापूरच्या इर्शाळवाडीतल्या ठाकूरवाडीवर बुधवारी रात्री मोठं संकट कोसळलं. मुसळधार पावसानंतर गावात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये जवळपास २५ ते ३० घरं माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गेल्याचं सांगितलं जात आहे. या घरांमधील जवळपास १०० नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री मंत्री उदय सामंत, बंदरविकास मंत्री दादा भुसे आदी मंत्रीही त्या ठिकाणी उपस्थित आहेत.

दरम्यान, या घटनेची आणि आतापर्यंत केलेल्या बचावकार्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान सादर केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळली आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी ही वाडी आहे. येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे मानवली गावातून पायी चालत जावं लागतं. वाडीत ४८ कुटुंबं वास्तव्यास असून तिथली लोकसंख्या २२८ इतकी आहे. इथे गेल्या तीन दिवसांत ४९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

बुधवारी रात्री १०.३० ते ११ च्या सुमारास ही घटना घडली. ११.३० वाजता जिल्हा प्रशासनाला याबाबतची माहिती मिळाली. १२ वाजता राज्य नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली. त्यानंतर तिथे तात्काळ प्रशासनाचे लोक पोहोचले. तिथली भौगोलिक परिस्थिती पाहता इर्शाळवाडी ही खूप छोटी वाडी आहे. दुर्गम डोंगरावर डोंगरकपारीत वसलेली ही वाडी आहे. तिथे वाहन जायला रस्ता नाही. तिथे दूरध्वनी, मोबाईल पोहोचणं कठीण आहे. ठाकर या आदिवासी लोकांची इथे प्रामुख्याने वस्ती आहे. हे ठिकाण संभाव्य दरडप्रवण ठिकाणांच्या यादीत समाविष्ट नाही. यापूर्वी या ठिकाणी अशी कोणतीही घटना घडलेली नाही.

हे ही वाचा >> पायाखाली पक्का रस्ता नाही, वरून पावसाला खंड नाही… रायगड दरड दुर्घटनेत बचाव पथकांसमोर आव्हानांचा ‘डोंगर’!

मुंबईपासून ८० किमी अंतरावर असलेल्या या गावी जाण्यासाठी चोख मानवली गावातून चालत जावं लागतं. ही वस्ती तीव्र उतारावर असल्याने दैनंदिन दळणवळणाच्या प्रमुख रस्त्याने जोडलेली नाही. या वाडीत वास्तव्यास असणाऱ्या ४८ कुटुंबांपैकी २५ ते २८ कुटुंबं बाधित झाल्याचा अंदाज आहे. २२८ पैकी ७० नागरिक घटनेवेळी सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. तर २१ लोक जखमी असून १७ लोकांवर तात्पुरत्या स्वरूपातील उपचार करण्यात आले आहेत. सकाळी १०.१५ वाजेपर्यंतच्या माहितीनुसार १० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

हे ही वाचा >> Raigad Landslide: ..आणि शाळकरी मुलांमुळे गाव जागा झाला! प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं ठाकूरवाडीत नेमकं काय घडलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीस यांनी सांगितलं की, हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर्स सज्ज आहेत. परंतु खराब हवामानामुळे उड्डाण होऊ शकत नाहीये. सर्व प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी आहे. जेसीबीसारखी यंत्रणा वर नेता येत नसल्यामुळे अकुशल मजुरांच्या साहाय्याने बचावकार्याचे प्रयत्न चालू आहेत. एनडीआरएफचे १५० तर ५०० अकुशल मजूर घटनास्थळी बचाव कार्यासाठी पाठवण्यात आले आहेत. माती, दगडांचा ढिगारा, तीव्र उतार, चिखल आणि मुसळधार पाऊस यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. एनडीआरएफच्या देखरेखीखाली स्थानिक ट्रेकर्स, जवान आणि सिडकोने पाठवलेले मजूर यांच्यामार्फत बचावकार्य सुरू आहे. यासह स्नायफर डॉग स्क्वाड घटनास्थळी पोहोचला आहे.