नितीन गडकरी यांना राजकारणातले अजातशत्रू मानलं जातं. त्यांचे सर्वपक्षीय संबंध चांगले आहे. मात्र अशी चर्चाही सुरु असते की त्यांना साईडलाईन केलं गेलं आहे. प्रकाश आंबेडकर असंही म्हणाले होते की भाजपाला २०० किंवा त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर पुढचे पंतप्रधान गडकरी होतील. या सगळ्यावर नितीन गडकरी यांनी उत्तरं दिली आहेत.

काय म्हटलं आहे नितीन गडकरींनी?

“पत्रकारांनी माझ्याबद्दल काय लिहावं? हा त्यांचा प्रश्न आहे. मीडियातला एक गट आहे जो मोदी आणि माझ्यामध्ये अंतर निर्माण करतो आहे. काहीतरी थिअरीज लिहिल्या जातात. त्याला काही अर्थ नाही. तसंच आम्हाला निवडणुकीत बहुमत मिळणार आहे. मोदीच पुढचे पंतप्रधान होतील. माझ्या डोक्यात असा कुठलाही विषय नाही. आम्हाला ४०० पार जागा मिळतील, मोदी देशाचे पुन्हा एकदा पंतप्रधान होतील.” असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातून अलिप्त झालो नाही

मी महाराष्ट्राच्या राजकारणातून अलिप्त झालो नाही. माझी निवडणूक सांभाळून मी प्रचार करेन. मी केंद्रीय मंत्री असल्याने ती कामं जास्त करतो. विकासाचे मुद्दे माझ्या भाषणात जास्त असतात असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीला नितीन गडकरींनी मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच पक्षात साईडलाईन केलं जातं आहे का? यावरही उत्तर दिलं आहे.

मला साईडलाईन वगैरे काहीही केलं जात नाही

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी असा आरोप केला होता की नितीन गडकरींना भाजपात साईडलाईन केलं जातं आहे. त्यावर प्रश्न विचारला असता नितीन गडकरी म्हणाले, “मला कुणीही साईडलाईन केलेलं नाही. तसं काही करण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. मी कायम एक गोष्ट सांगतो मंत्री माजी मंत्री होतो, खासदार माजी खासदार होतो, आमदार माजी आमदार होतो, पण कार्यकर्ता कधीच माजी होत नाही.भाजपाची विचारधारा आणि संघाचं स्वयंसेवकत्व हे माझ्या आयुष्याचे घटक आहेत. त्यामुळे मला साईडलाईन करण्याचा प्रश्नच नाही. मी मंत्री आहे मला सरकारने दिलेलं काम मी करत असतो. उद्या पक्षाचं काम करायला सांगितलं तर ते करेन.”

हे ही वाचा- Lok Sabha Election: भाजपाने जाहीर केली स्टार प्रचारकांची पहिली यादी, मोदी, शाह, फडणवीस यांच्यासह ४० नावं

मोदी आणि तुमच्यात वाद आहे का?

मोदी आणि तुमच्यात वाद आहेत का? हे विचारलं असता नितीन गडकरी म्हणाले, “माझ्यात आणि मोदींमध्ये काहीही वाद नाही. ठराविक पत्रकार जे मोदींवर टीका करायला घाबरतात ते माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून लिहितात. कुणीतरी एक चुकीचं लिहितो आणि मग त्यातून बातम्या तयार होतात. उगाच गैरसमज होतात. मोदी आणि माझ्यात चांगला संवाद आहे कुठलीही अडचण आहे. अकारण अशा बातम्या आल्या तर मनस्ताप होतो.” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.