सातारा : भटक्या विमुक्त समाजाचे स्वातंत्र्य चळवळ व राष्ट्र उभारणीतील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राज्य व जिल्हास्तरावर ३१ ऑगस्ट रोजी ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय केवळ प्रतीकात्मक नसून, भटक्या विमुक्त समाजाच्या सामाजिक न्याय, आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेसाठी एक निर्णायक टप्पा आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
गोंदवले बुद्रुक (ता माण) येथील श्री संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भटके विमुक्त दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून या समुदायाचा संघर्ष, योगदान आणि सामाजिक हक्क समाजातील अन्य घटकांपर्यंत पोहोचेल.
शाळेमध्ये भटक्या व विमुक्त समाजाच्या संस्कृतीतील जीवनमूल्ये, परंपरा यांचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक, शैक्षणिक व माहितीपर उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याची पाहणी गोरे यांनी करून शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मुक्त संवाद साधला. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने शाळेत राबविलेल्या उपक्रमांबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्साह ऊर्जादायी होता. या कार्यक्रमास प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक कांचन जगताप, गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे, संत गाडगे महाराज आश्रमशाळेचे संचालक सूर्यकांत माने, संचालक शिवाजी महानवर, गोंदवलेचे सरपंच विष्णुपंत कट्टे पाटील, राहुल भोसले यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.