सावंतवाडी :सुप्रसिद्ध साहित्यिक कै.जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्टा आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुल्या साहित्य चर्चेत नुकतीच दळवींच्या ‘निवडक ठणठणपाळ’ या पुस्तकावर रसपूर्ण चर्चा झाली.
साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक आणि कवी श्री.विनय सौदागर यांनी पुस्तकाची तांत्रिक माहिती देत ‘ठणठणपाळ’ या लोकप्रिय सदराच्या जन्माची रोचक कथा सांगितली. त्यांनी सांगितले की, सुरुवातीला गं.प.परचुरे यांच्या ‘परचुरे’ मासिकात मो.ग.रांगणेकर ‘घटका गेली, पळे गेली’ हे सदर लिहीत असत. मात्र, त्यातील टीकेमुळे नाराजी वाढल्याने ते बंद करावे लागले. पुढे पुरुषोत्तम धाक्रस यांनी ‘परचुरे’चे संपादक झाल्यावर जयवंत दळवी यांना हे सदर पुन्हा सुरू करण्याची विनंती केली. त्यानंतर हे सदर मॅजेस्टिक प्रकाशनाच्या ‘ललित’ मासिकातून सुरू झाले आणि अल्पावधीतच वाचकांच्या मनात घर केले. ‘ठणठणपाळ’ हे जयवंत दळवीच आहेत, हे लोकांना कसे समजले याचा मजेदार किस्साही सौदागर यांनी यावेळी सांगितला. त्यांनी पुस्तकातील काही निवडक आणि लक्षवेधी भागांचे वाचनही केले, ज्यामुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले.
या पुस्तकावर झालेल्या खुल्या चर्चेत सचिन दळवी, मंगेश नाडकर्णी, दीपक करंडे, सचिन गावडे, नीलम कांबळे, एकनाथ शेटकर, सरोज रेडकर, जयदीप देशपांडे, विनय फाटक, डॉ.गणेश मर्ढेकर, अविनाश जोशी, सोमा गावडे, प्राची पालयेकर, अनिष्का रगजी, कादंबरी म्हस्के आणि सुधा साळगावकर यांसारख्या अनेक साहित्यप्रेमींनी सक्रिय सहभाग घेतला आणि आपले विचार व्यक्त केले.
या विशेष कार्यक्रमात गजानन मांद्रेकर यांनी ललित साहित्यातील लोकप्रिय लेखक कै.रवींद्र पिंगे यांच्या ‘देवघरचा पाऊस’ या पुस्तकातील ‘सदाप्रसन्न जयवंत दळवी’ या महत्त्वपूर्ण लेखाचे वाचन केले, ज्यामुळे दळवींच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंची उपस्थितांना नव्याने ओळख झाली.
खुल्या साहित्य चर्चेतील हे २६ वे पुष्प होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विनय सौदागर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाची रूपरेखा सांगितली. कार्यक्रमाच्या यशस्वी समारोपानंतर त्यांनी आभार प्रदर्शन केले.
दरम्यान, खटखटे ग्रंथालयाचा आणि साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सक्रिय सदस्य मिहीर नाईक याने दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय ९६ टक्के गुण मिळविल्याबद्दल खटखटे ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष सचिन गावडे आणि कार्यवाह सचिन दळवी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन करण्यात आले.