Jitendra Awhad : लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत. सरसकट सर्वांना लाभ देणे चुकीचं होतं, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. योजनेतील अर्जांच्या पडताळणीचे काम सुरु असून यापुढे फक्त गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. याबाबत आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना याबाबत विचारलं असता त्यांनी ही योजना म्हणजे निवडणूक जिंकण्याचा सुनियोजित कट होता असा आरोप केला आहे.
जितेंद्र आव्हाड बकरी ईदबाबत काय म्हणाले?
बकरी ईद व्हर्चुअल करा असं म्हणणारे मंत्री आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत. अतिशय टेक्नोसॅव्ही मंत्री आपल्याकडे आहेत. उद्या ते जेवणही व्हर्चुअली करा असं सांगू शकतात. त्याची तयारीही आपण ठेवली पाहिजे असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी नितेश राणेंना लगावला. त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेबाबतही त्यांनी भाष्य केलं.
लाडकी बहीण योजना हा सुनियोजित कट-जितेंद्र आव्हाड
लोकसभेच्या पराभवानंतर लाडकी बहीण योजना ही मतं विकत घेण्यासाठी आणलेला एक सुनियोजित कट होता. मतं विकत घेतली, सरकार आलं. सरकार आल्यानंतर हे त्यांना स्पष्ट दिसत होतं की जे पैसे देत आहोत त्यामुळे राज्याची तिजोरी रिकामी होणार आहे. आज तिजोरी रिकामी झाली आहे, तिजोरीत पैसेच नाहीत हे लक्षात आल्यावर आम्ही घाई केली, चुकीच्या पद्धतीने योजना आणली वगैरे कबुली देत जवळपास ७० टक्के बहिणींना हे सरकार पैसे देणार नाही. लाडक्या बहिणींबरोबर हे होणारच होतं. एकदा निवडणूक जिंकल्यानंतर बहिणींची गरज काय? साडेचार वर्षांनी बहिणींची आठवण येईल. असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी दिलेल्या कबुलीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी ही टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर चर्चेत आली लाडकी बहीण योजना
गेल्यावर्षी म्हणजेच ४ जून २०२४ ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालांमध्ये महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी भाजपासह महायुतीला फक्त १७ जागा जिंकता आल्या. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. त्यानंतर नोव्हेंबर २०२४ या महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होती. या निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने सरकारने लाडकी बहीण योजना राबवली. ज्याअंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये देण्यात आले. पुन्हा सरकार आल्यास दरमहा २१०० रुपये देऊ अशी घोषणाही करण्यात आली होती. महायुतीचं सरकार आलं. पण दरमहा २१०० रुपये करण्यात आलेले नाहीत. तसंच योजना बंद झालेली नसली तरीही छाननी काटेकोर पद्धतीने करण्यात येते आहे. त्यामुळे सरसकट सगळ्या महिलांना याचा लाभ मिळणं आता बंद झालं आहे. ज्या महिला योजनेसाठी पात्र आहेत अशाच महिलांना लाभ मिळतो आहे. या सगळ्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जे वक्तव्य केलं त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी लाडकी बहीण योजना हा निवडणूक जिंकण्यासाठीचा सुनियोजित कट होता हा आरोप केला आहे.