कराड : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादून ५० वर्षापूर्वीच लोकशाहीची हत्या केली, देशासाठी तो काळा दिवस होता. काँग्रेसने अशाप्रकारे संविधानाची मोडतोड करण्याचे काम ५० वर्षांपूर्वीपासून केल्याचे टीकास्त्र भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष, आमदार चित्रा वाघ यांनी सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवभारत निर्मितीसाठी कृतिशील असल्याचा विश्वास त्यांनी दिला.
भाजप महिला मोर्चातर्फे आयोजित महाराष्ट्रातील पहिली प्रात्यक्षिकात्मक संसद (मॉक पार्लमेंट) कराडमध्ये पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार डॉ. अतुल भोसले, उत्तरा भोसले, डॉ. वर्षा भोसले, कविता कचरे यांच्यासह भाजपच्या राज्यातील महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. या वेळी खासदारांची वेशभूषा परिधान करून तशा भूमिकेत अनेक महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.
चित्रा वाघ म्हणाल्या, पंतप्रधान असताना, इंदिरा गांधी यांनी देशात सन १९७५ मध्ये आणीबाणी लागू केली. जनतेच्या अधिकारांवर गदा आणली, सरकारच्या विरोधात जो बोलेल त्याला तुरुंगात टाकले. स्वातंत्र्याच्या २८ वर्षांनंतर जनतेला वेठीस धरले गेले. तो दिवस काळा दिवस म्हणून भाजप साजरा करत आहे. संविधानाची मोडतोड कशाप्रकारे काँग्रेसने केली हे आजच्या युवकांना माहीत झाले पाहिजे. यामुळे प्रात्यक्षिकात्मक संसदेचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार वाघ यांनी सांगितले.
आमदार अतुल भोसले म्हणाले, संसदेचे काम कशाप्रकारे चालतं हे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवकांना दाखवण्याचे काम हे भाजप महिला मोर्चाच्या माध्यमातून यशस्वीरीत्या येथे झाले. आणीबाणीमध्ये काय परिस्थिती उद्भवली? आणि त्या परिस्थितीचा उल्लेख घेऊन या संसदेत सत्तारूढ पक्ष, विरोधी पक्ष यांच्यातील विविध संभाषणाच्या विषयीची चर्चाही या माध्यमातून घडवून आणण्याचे काम महिला मोर्चाच्या माध्यमातून झाले आहे.
प्रात्यक्षिकात्मक संसदेचे थेट प्रक्षेपण
महाराष्ट्रातील या पहिल्या प्रात्यक्षिकात्मक संसदेतील चर्चेतून तरुण पिढीला संसद कसे चालते? संसदेत कशा पद्धतीचे विचार मांडले जातात आणि त्या विचारांमधून आपण बोध काय घेतला पाहिजे. या विषयीचे एक व्यवस्थित चित्र तयार करण्याचे काम झाले. याचे थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने ते समाजमाध्यमाच्या माध्यमातून भ्रमणध्वनी, दूरदर्शन संच यावर असंख्य नागरिकांना थेट पाहायला मिळाले.