कराड : पश्चिम घाटमाथ्यासह कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरधार सुरू असून, गेल्या तीन दिवसांत कोयना धरणातील जलआवक तिप्पट झेपावली आहे. मात्र, साडेतीन फूट उघडलेले धरणाचे सहा वक्री दरवाजे बंद करण्यात आले आहेत. ३१ जुलैपर्यंत धरणसाठा ७७ टीएमसी (अब्ज घनफूट) राखण्याचे धोरण धरण व्यवस्थापनाने अचानक बदलले आहे.
वरिष्ठांशी सलामसलत करून हा निर्णय झाला असून, जुने संदर्भ व पाण्याची आवक याचा अंदाज घेऊन कोयनेच्या दरवाजातून विसर्ग करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता महेश रासनकर यांनी लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले आहे. दरम्यान यंदा पावसाने खरीप हंगामाला तडाखा दिला आहे. जलसाठे मात्र, उत्तम स्थितीत दिसत आहेत.
सध्या कोयना धरणाचा जलसाठा ७९.४१ टीएमसी (७५.४५ टक्के) असून, जलआवक २५,२७९ क्युसेक (प्रतिसेकंद घनफूट) सुरू आहे. दुसरीकडे पायथा वीजगृहातून केवळ २,१०० क्युसेक पाण्याचा जलविसर्ग सुरू असल्याने कोयनेच्या ८० टीएमसीच्या घरात पोहचलेल्या धरणसाठ्यात दिवसागणिक दोन-सव्वादोन टीएमसी पाण्याची आवक होत आहे.
कोयना पाणलोटात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत १३७.३३ मिमी (५.४० इंच) असा तुफान पाऊस झाला आहे. तर, यंदा आजवर सरासरी २,७८५.६६ मिमी (एकूण वार्षिक सरासरीच्या ५५.७१ टक्के) असा विक्रमी पाऊस झाला आहे.
शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या कालावधीत कोयना पाणलोट क्षेत्रात महाबळेश्वरला २५, नवजाला ३१, तर कोयनानगरला २० मिमी, तर, कुंभी धरण ३१ मिमी, कडवी ३२, धोम-बलकवडी १३, दूधगंगा ३५, धोम ३, वारणा २०, तारळी १० मिमी असा धरणांच्या परिसरातील पाऊस आहे. तसेच अन्यत्र, पाथरपुंज येथे सर्वाधिक ९१ मिमी, जोर येथे ७७, दाजीपूर ५४, प्रतापगडला ४८ मिमी, पाथरपुंज ५६ व मांडुकली येथे ४३ मिमी असा जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान यंदा पावसाने खरीप हंगामाला तडाखा दिला आहे. सततच्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. जलसाठे मात्र, उत्तम स्थितीत दिसत असताना खरिपाचे मात्र या पावसाने नुकसान केले आहे.
दरम्यान जुने संदर्भ व पाण्याची आवक याचा अंदाज घेऊन कोयनेच्या दरवाजातून विसर्ग करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता महेश रासनकर यांनी लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले आहे.