सावंतवाडी : अतिवृष्टीमुळे सर्वानी काळजी घेतली पाहिजे. यासाठी आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवा. सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण कंपनी, महसूल यंत्रणेने पूरपरिस्थितीची खबरदारी घ्यावी. नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करा आणि जीव वाचवण्यासाठी लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करा, असे आवाहन शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी केले. नुकसानभरपाई जलदगतीने द्या, असे त्यांनी आवाहन केले.

सावंतवाडी मतदारसंघातील झाडे उन्मळून पडल्याने, घराचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्यांना तसेच पाळीव जनावरे मृत्युमुखी पडली त्यांना शासकीय नुकसानभरपाई जलदगतीने द्या. तसेच मी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, असे केसरकर यांनी सांगितले. शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आपत्कालीन यंत्रणा बैठक नगर परिषद सभागृहात झाली.

या वेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, संजय आंग्रे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, मुख्याधिकारी सागर साळुंखे, तहसीलदार श्रीधर पाटील, वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी, तिलारी प्रकल्प कार्यकारी अभियंता विनायक जाधव, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता श्री. सर्वेगौड, जिल्हा परिषद बांधकाम अनिल आवटी, तसेच अधिकारी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केसरकर म्हणाले, सर्वानी अलर्ट राहावे. जनतेची काळजी घ्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर पाणी येणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्यासाठी गटार साफ करावे. दोडामार्ग ते तिलारी रस्त्यावर पाणीच पाणी आहे. गटार नाही. रस्ते खराब होत आहेत. बांदा तेरेखोल नदीला पूर आल्याने सतर्क राहावे. वीज वितरण कंपनीने तात्काळ बांदाला भेट देऊन समस्या निवारण करावे. सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची गरज असल्यास तातडीने कारवाई करा. केसरकर म्हणाले, आंबोली घाटात लक्ष ठेवून दरड कोसळली तर यंत्रणा सतर्क ठेवा.