कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील २० हजारावर गायरान मधील अतिक्रमणे कायम करावीत, या मागणीसाठी मंगळवारी कोल्हापुरात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. सामान्य लोकांच्या घरावर सरकार राज्य सरकार कारवाई करू पाहत आहे. त्याऐवजी त्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. चुकीचे काही घडल्यास राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशारा माजी मंत्री सतेज पाटील यांनी मोर्चा वेळी दिला.
राज्यातील २ लाख २२ हजार अतिक्रमणे वर्ष अखेर पर्यंत काढण्यासाठी शासनाने जिल्हानिहाय कालबद्ध आराखडा तयार केला आहे. या निर्णयाच्या विरोधात कोल्हापुरातील भाजप – शिंदे गेट वगळता सर्वपक्षांनी आंदोलन सुरू केले आहे. गायरानातील अतिक्रमण कायम करावे या मागणीसाठी आज दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळवावी अशी मागणी केली.
कोल्हापुरात उद्रेक होईल
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य शासनाने गरीब लोकांच्या घरांची बाजू व्यवस्थित न मांडल्याने ही वेळ आली आहे. या विरोधात गरीब जनता हिसका दाखवण्यासाठी राहणार नाही, असा इशारा दिला. ठाकरे गटाचे शिवसेनाप्रमुख संजय पवार यांनी घर हे सामान्य माणसाचे स्वप्न असताना ते उध्वस्त करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. तसा प्रकार घडल्यास कोल्हापुरात उद्रेक होईल, असा इशारा दिला. आमदार ऋतुराज पाटील यांनी आजची गर्दी हा ट्रेलर आहे सिनेमा अजून बाकी आहे, असा उल्लेख करीत गायरान अतिक्रमणाला लावून हात लावण्यापूर्वी ऋतुराज पाटील यांच्या केसाला धक्का लावावा, असा आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी राष्ट्रावादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, भाकपचे सतीशचंद्र कांबळे,आठवले रिपाईचे शहाजी कांबळे, गोकुळचे संचालक चेतन नरके, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांची भाषणे झाली.
टोलेबाजी लक्षवेधी
माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी अतिक्रमण काढायला गेल्यास रक्तरंजित प्रकार घडेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. त्यातून मार्ग निघाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा दिला. तेव्हा माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नरके तुम्ही शिंदे गटासोबत आहात. थेट मुख्यमंत्र्यांकडून जाऊन बसून न्याय मागावा, असा टोला भर सभेत लगावला.