कोल्हापूर: अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची आर्थिक मदत तत्काळ द्यावी, अशी मागणी इंडिया आघाडीच्या वतीने बुधवारी येथे करण्यात आली.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील घटक पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.
कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीसह इतर क्षेत्रांमध्ये नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतमालाचे, घरे, जनावरे, तसेच रस्ते आणि पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची तत्काळ आर्थिक मदत शासनाकडून देण्यात यावी. राज्य शासनाने अवकाळी पावसाला राज्य विशेष नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केल्याने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या वार्षिक अनुदानाच्या १० टक्क्यांपर्यंत निधीचा वापर करून बाधित नागरिकांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी केली.
खासदार शाहू महाराज यांनी पडझड झालेल्या घरे, पिकांचा पंचनामा करण्याची सूचना जिल्हाधिकारी येडगे यांना केली. इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.