राहाता : तालुक्यातील कोल्हार, हनुमंतगाव, पाथरे व पंचक्रोशीतील गावांत झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा, कोणालाही पाठीशी न घालता ओढे, नाल्यांवरील अतिक्रमण एक महिन्यात काढा, असा आदेश जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला आहे. पावसाने शेती पिकांचे मोठे प्रमाणात केले.
पाण्याची वाट अतिक्रमित झाल्यामुळे पाणी शेतात घुसले, याचाही मोठा फटका बसला. या पार्श्वभूमीवर विखे यांनी लोणी येथे बैठक घेतली. प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, सार्वजनिक बांधकामचे अभियंता श्रीनिवास वर्पे, जलसंपदाचे स्वप्निल काळे यांसह अन्य विभागांचे अधिकारी, तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
ओढे, नाल्यावरील अतिक्रमणामुळेच शेतात पाणी गेल्याची गंभीर बाब निदर्शनास आल्याने महसूल, तसेच जलसंपदा विभागाने एकत्रितपणे पाहणी करून तातडीने ओढे, नाले अतिक्रमणमुक्त करण्याच्या सूचना विखे यांनी दिल्या. आवश्यकता भासल्यास मोजणी करा, अतिक्रमण कोणाचेही असो पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
कृषी विभागाने सरसकट पंचनामे करावेत. ई पीक पाहणीतील मर्यादाही लक्षात घ्या. ज्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला नाही अशा शेतकऱ्यांसाठी शासन नियमाप्रमाणे भरपाई कशी मिळेल, याचा प्रयत्न करण्याचे विखे यांनी कृषी अधिकाऱ्यांना सांगितले. वन विभागाने बिबट्याच्या बंदोबस्त करण्यासाठी पिंजऱ्याची मागणी वाढत असल्याने जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करावा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
भूखंडांचे व्यवहार तपासा
भूखंडाची अनधिकृत विक्री झाल्याच्या तक्रारी बैठकीत करण्यात आल्या. याबाबत झालेल्या व्यवहारांची पुन्हा तपासणी करावी, तसेच कोल्हार व लोणी खुर्द येथील भूखंडांचे व्यवहार नियमाप्रमाणे आहेत किंवा नाही हे तपासण्याची दक्षता प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी घेण्याचे निर्देश मंत्री विखे यांनी दिले.