राज्यात करोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या देखील महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. याबाबत राज्याचे संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी विधीमंडळात या नव्या निर्बंधांची आणि नियमाची माहिती दिली.

महाराष्ट्रातील नवे निर्बंध खालीलप्रमाणे,

  • संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.
  • लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
  • इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील  उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
  • उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी  क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल.  अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
  • क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
  • वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.
  • उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील.  या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.
  • याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी  त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.
  • जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दरम्यान, युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे.  जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. वाढत्या करोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे, मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एवढेच नव्हे तर केंद्रीय आरोग्य विभागाने देखील सर्व राज्यांसाठी संसर्ग रोखण्याकरिता पुरेशी काळजी घेण्यास व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. सध्याच्या निर्बंधाचे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपाचे असून ते आत्ताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

दिवसभरात १४१० नव्या करोनाबाधितांची नोंद; ओमायक्रॉनचेही २० रुग्ण आढळले

गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगभरात भितीचं वातावरण निर्माण केलं आहे. भारतात आणि महाराष्ट्रात देखील ओमायक्रॉनचा फैलाव आता होऊ लागल्याचं चित्र दिसू लागलं आहे. आज दिवसभरात राज्यात ओमायक्रॉनचे २० नवे रुग्ण सापडले आहेत. यापैकी ६ रुग्ण पुण्यात, मुंबईत ११, साताऱ्यात २ तर अहमदनगरमध्ये १ रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता राज्यातल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १०८ इतकी झाली आहे. यापैकी सर्वाधिक ४६ रग्ण मुंबईत आहेत.

एकीकडे ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली असताना दुसरीकडे एकूण करोना रुग्णसंख्येत देखील आज दिवसभरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या २४ तासांत राज्यात एकूण १४१० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत राज्यात आढळलेल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा ६६ लाख ५४ हजार ७५५ इतका झाला आहे. त्यापैकी ८ हजार ४२६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्याचा रिकव्हरी रेट ९७.५९ टक्के!

राज्यात आज दिवसभरात ८६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे करोनावर मात केलेल्या महाराष्ट्रातील एकूण बाधितांचा आकडा आता ६५ लाख १ हजार २४३ इतका झाला आहे. या आकडेवारीनुसार राज्याचा रिकव्हरी रेट हा ९७.५९ टक्के इतका झाला आहे.

हेही वाचा : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आगामी परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन? उच्च शिक्षणमंत्र्यांचं मोठं विधान

१२ करोनाबाधितांचा मृत्यू

दरम्यान, आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात १२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा १ लाख ४१ हजार ४०४ इतका झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक १६ हजार ३६८ मृत्यू मुंबईत झाले आहेत. राज्याचा मृत्यूदर सध्या २.१२ टक्के इतका आहे.